किणये / वार्ताहर
बेळगुंदी-पिरनवाडी परिसरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेळगुंदी-पिरनवाडी या दोन्ही गावांमध्ये एक-एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिक आता सतर्क झाले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. नेहमी वर्दळ असणाऱया रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
दोन्ही गावांतील ग्राम पंचायतांचे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्या गावांमध्ये जनजागृती करून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करीत आहेत. बेळगाव जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर पोहोचली आहे. यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पिरनवाडीतील मुख्य रस्ता व मच्छे, हुंचेनहट्टी या भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच बेळगुंदी परिसरातील बेळगुंदी-राकसकोप मुख्य रस्ता व सोनोली रस्त्यावर झाडे टाकून सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेर गावातील लोकांचा गावात प्रवेश होऊ नये व कोरोनाचा संसर्ग टाळता यावा, यासाठी नागरिकांनी स्वतःहून गावातील सीमा बंद केल्या आहेत.
जनावरांचे हाल
बेळगुंदी गावात सीलडाऊन केले असून कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गावात ड्रोन कॅमेऱयाची नजर ठेवण्यात आली आहे. सर्व प्रकारची दुकाने बंद केली असून शेतकऱयांनी शेतातही जाऊ नये, असे कळविले आहे. जर शेतात जाता आले नाही तर जनावरांना चारा कुठून घालावा, असा शेतकऱयांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.