रस्त्यावर धूळ-मातीचे साम्राज्य : अपघातांच्या घटनांमध्ये वाढ : रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करण्याची मागणी
वार्ताहर / किणये
बेळगुंदी ते राकसकोप रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमुळे वारंवार अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
बेळगुंदी ते सोनोली नाल्याजवळ रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या ठिकाणी भलेमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात बुधवारी एक ऊस वाहतूक करणारी ट्रक्टर ट्रॉली पलटी झाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य रस्त्यावरच उसाने भरलेला ट्रक्टर पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. गेल्या महिनाभरात पाच-सहा अशा अपघातांच्या घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासनाचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.गेल्या पाच-सहा वर्षांपासून बेळगुंदी ते राकसकोप रस्ता दुर्लक्षित झाला आहे. काही ठिकाणी तर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. यामुळे सध्या रस्त्यावर धूळ-मातीचे साम्राज्य पसरलेले आहे. बेळगुंदी नाल्याजवळ रस्ता अधिक प्रमाणात खराब झालेला आहे. मुसळधार पावसात सोनोली नाल्यावर पाणी आले होते. त्यामुळेही रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बेळवट्टी, बिजगर्णी, इनाम बडस, कावळेवाडी आदी गावांतील वाहनधारकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. प्रशासनाच्या अधिकाऱयांनी या रस्त्याची त्वरित पाहणी करून डांबरीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
बेळगुंदी-राकसकोप या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. राकसकोप येथून सध्या रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे. मात्र, हे कामकाज धिम्यागतीने चालू आहे. या परिसरातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्याने रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.