ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना संकट काळात बेस्ट च्या सेवेतील एस टी कर्मचाऱ्यांना दररोज 225 रुपये भोजनभत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे.
ते म्हणाले, मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी. महामंडळाच्या सुमारे 1 हजार बस बेस्टच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्यासाठी राज्यभरातील एस.टी. महामंडळाचे साडे चार हजार कर्मचारी मुंबईत बेस्टची सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांना आता रोज 225 रुपये भोजनभत्ता दिला जाणार आहे.
राज्यभरातून बेस्टच्या सेवेसाठी मुंबईत दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एका खासगी संस्थेकडे देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि संबंधित कंपनीकडून जेवण पुरवण्याची वेळ यात तफावत असल्यानं कर्मचाऱ्यांच्या जेवणाची समस्या निर्माण झाली होती. त्यासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या, याची दखल मंत्री अनिल परब यांनी घेतली आहे.
त्यासोबतच संबंधित संस्थेला दिलेले कंत्राट तातडीने रद्द करत सर्व कर्मचाऱ्यांना रोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा, असा आदेश अनिल परब यांनी दिला आहे. या आदेशाचं पालन करत एस.टी. महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना रोज भोजनभत्ता देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.