अधिकाऱयांना घेराव घालून नागरिकांनी केल्या तक्रारी : दोन दिवसांत पाणी समस्या निवारणाचे आश्वासन
प्रतिनिधी / बेळगाव
कोनवाळ गल्ली परिसरातील पाणी समस्येबाबत ठोस आंदोलन छेडण्यासाठी बुधवारी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र याची माहिती एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांना मिळताच ते बुधवारी सकाळी कोनवाळ गल्लीत दाखल झाले. यावेळी नागरिकांनी अधिकाऱयांना घेराव घालून पाणी समस्येबाबत धारेवर धरले. येत्या दोन दिवसांत पाणी समस्या निवारणासाठी उपाययोजना राबविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
कोनवाळ गल्ली परिसरात सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. काहीवेळा दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उच्चदाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. काहींनी नळांना थेट विद्युतपंप लावले असल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. मुबलक आणि उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी तक्रार एलऍण्डटी आणि महापालिकेकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन कोनवाळ गल्लीत खड्डा खोदून जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे नाटक करण्यात आले. पंधरा दिवस हा खड्डा बुजविण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळय़ात पाणी समस्येला तोंड द्यावे लागले.
त्यावेळीदेखील आंदोलन छेडण्याची तयारी नागरिकांनी चालविली होती. पण समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन छेडण्यात आले नाही. मात्र अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत केला नसल्याने ही समस्या तीव्रतेने भेडसावत आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणी समस्या व सर्व्हिस रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस आंदोलन छेडण्याकरिता बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता गल्लीतील नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र याची कुणकुण एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांना लागताच बैठकीपूर्वीच अधिकारी कोनवाळ गल्लीत दाखल झाले. बुधवारी सकाळी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी पाणी समस्येची माहिती घेण्यासाठी पाहणी केली. यावेळी गल्लीतील नागरिकांनी अधिकाऱयांना घेराव घालून तक्रारींचा पाढा वाचला.