प्रतिनिधी / फलटण :
सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगतच्या फलटण तालुका हद्दीत येणाऱ्या राजुरी गावामध्ये विनापरवाना बैलगाडा शर्यतीचा डाव आखण्यात आला होता. त्यासाठी शर्यत मार्गही तयार करण्यात आला होता. फलटण ग्रामीण पोलीसांना यासंदर्भात माहिती मिळताच पोलीसांनी कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने बैलगाडा शर्यतीचा मार्ग उध्वस्त केला.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, राजुरी गावामध्ये दर रविवारी बैलगाडा शर्यत व जुगाराचे नियोजन केले जात असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी बैलगाडा शर्यतीसाठी तयार करण्यात आलेले मैदान आढळून आले असता हे शर्यतीचे मैदान जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करत त्या ठिकाणी जागोजागी मोठे खड्डे पाडून त्यामध्ये जुनाट बाभळी आणि इतर काटेरी झाडे टाकण्यात आली. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरणार नाहीत, अशी माहिती ग्रामीण पोलीसांनी दिली.