पोलिसांना पाहताच बैलगाडय़ा उधळल्या, तीन जण लागले सातारा तालुका पोलिसांच्या हाताला
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील लिंब गावातील काही शेतकऱयांना बैलगाडी पळवण्याचा नाद आहे. ते दर पंधरा दिवसांनी लिंब खिंडीत डोंगर नावाच्या शिवरात बैलगाडय़ा पळवण्याचा कार्यक्रम करतात. शुक्रवारी एका व्हॉट्सऍप ग्रुपवर आवाहन करत बैलगाडीच्या शर्यती भरवल्या होत्या. तब्बल दोनशेहून अधिकजण या शर्यतीला आले होते. याची कानकुण सातारा तालुका पोलिसांना लागली अन् शर्यतीला बैल जुपाजुपी सुरु असतानाच पंधरा पोलीस तेथे पोहचताच शर्यतीच्या जुपलेल्या गाडय़ा व गाडय़ावरील जॉकींनी तशाच गाडय़ा भुंगाट पळवल्या दिसेल तिकडे. केवळ तीन जण पोलिसांच्या हाताला लागले. या गुह्याची नोंद रात्री उशीरापर्यंत करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरु होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोनामुळे जिल्हाधिकाऱयांनी नियम कडक केलेले आहेत. त्याच नियमात गर्दी करु नये, कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेवू नये असे असतानाही लिंब गावच्या हद्दीतील लिंब खिंड परिसरातील डोंगर नावाच्या शिवारात बैलगाडय़ांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. त्या शर्यतीला तब्बल दोनशेहुन अधिकजण आले होते. तसे या ठिकाणी दर पंधरा दिवसांनी स्पर्धा होत होत्या. त्या स्पर्धा मोजक्यांच शेतकऱयांच्यामध्ये रंगायच्या. त्यात जो जिंकेल त्याला ठरलेली रक्कम दिली जायची. आज जरा मोठय़ा प्रमाणात बक्षीसाची रक्कम होती. त्यामुळे जिह्यातून मोठमोठी बैलगाडा स्पर्धक आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही शर्यती असल्याची माहिती खास खबऱयांकडून सातारा तालुका पोलिसांना मिळाली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांनी 15 जणांची टीम स्पर्धेच्या ठिकाणी पाठवली. डोंगर नावाच्या शिवारात दुपारी 12 वाजता बैलगाडय़ा शर्यतीला जुपाजुपी सुरु होती. तोच तेथे पंधरा पोलिसांना पहाताच जुपलेल्या बैलगाडया सैराट जिकडे दिसेल तिकडे पळवल्या. तर काहीजण बघायला आलेले तेही रानावनातून पळू लागले. पोलिसांना फक्त तीनच जण सापडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती. त्यामुळे त्यांची नावे पोलिसांकडून मिळू शकली नाहीत.