पोलिसांनीही नाहक त्रास दिल्याचा आरोप : न्याय देण्याची गाणगी कुटुंबीयांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
किरकोळ कारणातून पत्नीने माझ्यासह माझ्या कुटुंबाबरोबर भांडण काढून मला सोडून दिले होते. तीन वर्षे तिने मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास दिला. त्यानंतर अचानक तिच्यासह नातेवाईकांनी आम्हाला मारबडव करून घरातून बाहेर काढले. तसेच दुसरे लग्न केल्याचा आरोप करत पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनीही आम्हाला नाहक त्रास दिला असून न्याय द्यावा, या मागणीसाठी कुटुंबासमवेत तसेच बैलजोडी घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. यावेळी त्यांनी आपली कैफियत मांडत न्याय देण्याची मागणी केली आहे.
रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावातील रवी गाणगी याने ही तक्रार केली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला सुटी असतानाच या कुटुंबाने बैलगाडीसह व आपल्या सर्व कुटुंबासमवेत धडक मारली आहे. यावेळी रवी यांनी पत्नीने आम्हाला नाहक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. मी दुसरे लग्न केलो असा खोटा आरोप तिने केला आहे. याबाबत कटकोळ पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्याठिकाणी मला व माझ्या कुटुंबीयांना बोलावून घेऊन चौकशी केली. यावेळी मी सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. दुसरे लग्न झाले असेल तर त्याचा पुरावा द्या व माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे सांगितले. तरीही आम्हाला पोलिसांनीही नाहक त्रास दिल्याचा आरोप गाणगी कुटुंबीयांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठाण मांडून त्यांनी ही मागणी केली आहे. बैलगाडी तसेच कुटुंबासह हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.