शहर वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील श्री ब्राह्मणदेव मित्रमंडळ, पहिलीवाडीच्या वतीने आयोजित खुल्या विनाफटका बैलगाडी शर्यत स्पर्धेत कणकवली येथील अनमोल ठाकूर यांचा बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हय़ातील 61 बैलगाडय़ांनी शर्यतीत सहभाग घेतला होता.
येथील धरणाचा माळ येथे रविवारी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचा शुभारंभ येथील अनंत बेर्डे यांची मानाची गाडी पळवून करण्यात आली. या शर्यतीत कणकवली येथील अनमोल ठाकूर यांच्या बैलगाडीने 1 मिनिट 7 सेकंद वेळ घेत प्रथम क्रमांक पटकाविला तर शाहुवाडी येथील केशव सकपाळ यांच्या बैलगाडीने 1 मिनिट 14 सेकंद वेळ घेत द्वितीय, संगमेश्वर येथील जगन्नाथ कदम यांच्या बैलगाडीने 1 मिनिट 15 सेकंद वेळ घेत तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ बक्षीस चिंचवली येथील अशफाक खान यांच्या बैलगाडीने 1 †िमनिट 16 सेकंद घेत पटकाविले आहे. तसेच येथील दीपक (बाळा) पडवळ यांच्या बैलगाडीने 1 मिनिट 21 सेकंद वेळ घेत तालुक्यात व जिल्हयात यशस्वी कामगिरी केली.
यावेळी प्रथम क्रमांक विजेता बैलगाडीला रोख रक्कम 11 हजार 111 व ढाल (वसंत नकाशे पुरस्कृत), द्वितीय क्रमांक विजेत्याला रू.7 हजार 777 व ढाल (संदेश मिठारी पुरस्कृत), तृतीय क्रमांक विजेत्याला रू. 5 हजार 555 व ढाल (शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ मुंबई पहिलीवाडी) तर उत्तेजनार्थसाठी रू. 2 हजार 222 व ढाल (सुशांत घाग) देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर, सरपंच समीक्षा वाफेलकर, पोलीस पाटील चंद्रकांत बेर्डे, ग्रामविस्तार अधिकारी विजय कांबळे, तलाठी विनोद धायगुंडे, आमदार स्वीय सहाय्यक सुभाष मालप, रोमेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमदार राजन साळवी, पशुवैद्यकीय अधिकारी सुर्वे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अनंत बेर्डे, उपाध्यक्ष रमेश चव्हाण, सरचिटणीस अनंत तोरस्कर, चंद्रकांत बेर्डे, मनोहर कदम, गणपत वाफेलकर, सुर्यकांत राऊत, शिवाजी सावंत, अशोक चव्हाण यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ताम्हाणे पहिलीवाडी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.