बाळेपुंद्री / वार्ताहर
बैलहोंगल व सौंदत्ती परिसरातील सुतगट्टी, हिट्टनगी, ऐनगी, गोवनकोप्प भागात मंगळवारी सांयकाळच्या सुमारास दोन तास वादळी वाऱयासह पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीचपाणी केले आहे. विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस कोसळल्याने काही घरांवरील पत्रे उडून गेले आहेत.
वादळी वाऱयामुळे सुतगट्टी येथील शेतकरी रमेश पुजारी यांची दोन एकर केळीची बाग जमिनदोस्त झाली आहे. तर बैलहोंगल शहरातील शंभूलिंग देवस्थानच्या कळसावर वीज पडून कळसाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे चार लाखाचे नुकसान झाले आहे. तहसीलदार डॉ. दुंडाप्पा हुगार यांनी पाहणी केली आहे. याच तालुक्यातील नेगिनहाळ-हन्नीकेरी परिसरात पावसामुळे अनेक घरांची हानी झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शिवारातील पिकांचेही नुकसान झाले आहे.
मंगळवारी दुपारच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार झाले व या भागात पावसाने हाहाकार माजवत सर्वत्र पाणीचपाणी केले. अनेक ठिकाणी 20 हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. शेतकऱयानी काबाडकष्ट करून पिकविलेल्या पिकांची हानी बघून शेतकरी हतबल झाला आहे. सुतगट्टी येथील शेतकरी रमेश पुजारी यांनी दोन एकरात 1600 हून अधिक केळीची झाडांची लागवड केली होती.त्यातील पाचशेहून अधिक झाडे वाऱयाने मोडून पडली आहेत. तर उर्वरित झाडानाही हानी पोहोचली आहे.