सप अध्यक्ष अखिलेश यांच्याकडून आश्वासनांचा वर्षाव
वृत्तसंस्था / उन्नाव
उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. समाजवादी पक्षाचे सरकार राज्यात आल्यास कानपूरपासून उन्नावपर्यंत मेट्रो धावू लागेल. तसेच बैलांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची भरपाई देण्यात येईल. तसेच सायकल दुर्घटनेत मृत्यू झाल्यास संबंधितांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे अखिलेश म्हणाले. विशेष बाब म्हणजे समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘सायकल’ हेच आहे.
2022 मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार येणार आहे. भाजपने पीयूष जैन या स्वतःच्याच उद्योजकावर छापे टाकले आहेत. त्यांना पुष्पराज जैन यांच्या ठिकाणी छापा टाकायचा होता, परंतु पीयूष जैन यांच्या येथे छापे टाकले गेले असा दावा अखिलेश यांनी केला आहे.
कोरोनाकाळात उन्नावमध्ये गंगेत अनेक मृतदेह वाहत होते. योगी सरकार लोकांना लाकूड देखील पुरवू शकले नाही. कोरोनाकाळात गेलेले बळी हे भाजपचे अपयश आहे. सरकारला औषधांची देखील व्यवस्था करता आलेली नाही. योगी आदित्यनाथ यांचे सरकार गरिबांना धोका देणारे असल्याचे अखिलेश म्हणाले.