पूर्वीप्रमाणे बससेवा सुरळीत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बैलूर व तोराळी गावांना अपुऱया बसफेऱयांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून शाळा-कॉलेजीस बंद होती. मात्र, सध्या शाळा, कॉलेजीस सुरू असूनही पूर्वीप्रमाणे बैलूर व तोराळी गावांना नियमितपणे बससेवा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
कोरोनापूर्वी बैलूर व तोराळी गावांना दिवसातून पाचवेळा बसफेऱया सुरू होत्या. पण सध्या केवळ तीन फेऱया होत आहेत. अपुऱया बससेवेमुळे विद्यार्थ्यांना शाळेला, महाविद्यालयाला दांडी मारून बससाठी धाव घ्यावी लागत आहे. तसेच अर्धवट वर्ग सोडूनही बसच्या वेळेत यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
जीव धोक्यात घालून प्रवास
तसेच केवळ तीन बसफेऱया सुरू असल्यामुळे बसमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बैलूर व तोराळी गावांना पूर्वीप्रमाणे बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.