शेताच्या बाजूलाच करणीबाधा केल्याने शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर / किणये
सध्याच्या आधुनिक युगात मानवाने बरीच प्रगती केली आहे. अलीकडे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वेगवेगळय़ा मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बैलूर परिसरात करणीबाधेचे प्रकार वाढू लागले आहेत. बैलूर रस्त्याच्या बाजूलाच गुरुवारी अमावास्येनिमित्त विविध साहित्य टाकले असल्यामुळे या भागात अंधश्रद्धेचा कळस दिसून येऊ लागला आहे.
कर्ले गावातील शंकर गोवेकर यांची बैलूर रस्त्याच्या बाजूला शेती आहे. त्या शेतात त्यांनी बिन्स लागवड केलेली आहे. गुरुवारी सकाळी बिन्सची तोडणी करण्यासाठी शेतकरी गेले असता आपल्या शेताच्या बाजूला रस्त्याकडेला विविध प्रकारचे साहित्य टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारांमुळे आजूबाजूच्या शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
या रस्त्याच्या बाजूला एक बुट्टी, काळा कपडा, लिंबू, गुलाल, विडय़ाची पाने, दोरा गुंडाळलेले नारळ, गुलाल लावलेला कोहळा असे साहित्य टाकण्यात आले होते. याचबरोबर एक उलटय़ा पंखांची जिवंत कोंबडीही त्या ठिकाणी सोडण्यात आली होती. हे पाहून गोवेकर यांच्या शेतात आलेल्या महिला भयभीत झालेल्या आहेत. गुरुवारी पहाटेच्या दरम्यान हे साहित्य आणून टाकले असल्याचा संशय गोवेकर यांनी व्यक्त केला आहे.
अमावास्येला असे साहित्य टाकल्यास आपला संसार, आपल्या कुटुंबाचे भले होते. यासाठी काही नागरिक आजही करणीबाधा सांगणाऱया ढोंगीबाबांच्या नादाला लागलेले आहेत. या साहित्यासाठी ते हजारो रुपये खर्चही करतात. असे साहित्य टाकून जर एखाद्याचे भले होत असेल किंवा त्यांच्यावरील संकट दूर होत असेल तर साऱयांनीच हा मार्ग अवलंबला असता. आपले कर्म चांगले असले पाहिजे, तेव्हा नियतीसुद्धा आपल्याला साथ देते व आपले भले होते, याची जाणीव असे प्रकार करणाऱयांना होण्याची गरज आहे.
स्थानिक पंचांनी लक्ष देण्याची गरज
अमावास्येच्या दिवशी काही रस्त्यांच्या बाजूला असे करणीबाधेचे प्रकार निदर्शनास येतात. गावपातळीवरील पंचमंडळींनी अशा ठिकाणांवर आपली देखरेख ठेवायला पाहिजे व समाजात असा अंधविश्वास पसरविण्याचे कार्य करणाऱयांवर कडक कारवाई करायला हवी.