काजु व मीरची पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
वार्ताहर/ बैलूर
बैलूर आणि परिसरातील उचवडे, कुसमळी, सोनारवाडी, देवाचीवाडी, तोराळी, बेटगेरी, मोरब आदी भागात वळिवाने दमदार हजेरी लावल्याने साऱयांचीच तारांबळ उडाली. गेल्या आठवडाभरापासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पावसाची दाट शक्यता होती. रविवारी दुपारी साडे तीनच्या दरम्यान वळिवाने या भागाला झोडपून काढले.
या भागात सकाळपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाला सुरुवात झाली. बैलूर भागामध्ये पावसासह गारब्यांची बरसात झाल्याने शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. जोरदार वाऱयासह व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे हवेमध्ये काही काळ गारवा निर्माण झाला होता. वळिवामुळे या भागातील विजपुरवठा संध्याकाळपर्यंत खंडीत करण्यात आला होता.
शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे काजु व मीरची पिकाला मोठा फटका बसला आहे. मीरची पिकाला आलेली लहान फुले गळून पडल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काजु पिकाला आलेला मोहोर व लागलेली कोवळी फळे वादळी वारा व गारब्यांच्या वर्षावामुळे गळून पडली आहेत. बैलूर भाग काजु उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथे झालेल्या वळिव पाऊसामुळे काजु उत्पादनात मोठया प्रमाणात घट होण्याची भिती आहे. यामुळे येथील शेतकरी व काजु बागायतदार हतबल झाले आहेत.