वार्ताहर/ बैलूर
बैलूर भागात सुगी हंगामाला जोर आला आहे. भात पिके कापणीला आल्याने तसेच पाऊस कमी झाल्याने भातकापणी व मळणी अशा आदी कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. सध्या या भागात सुगी साधण्यासाठी शेतकरीवर्ग धडपडत असल्याचे चित्र दिसत आहे.
यावर्षी बैलूर भागात पावसाने चांगली साथ दिल्याने भात पिके जोमात होती. मात्र, परतीच्या पावसाने गेल्या महिन्याभरापूर्वी भात पिके पोसवणीला आली असताना पावसाने झोडपून काढल्याने भात पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे भात पिके आडवी झाली आहेत. तसेच भाताच्या लोंबात चिंब धरले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल तरीही पाणथळ भात शेतीत पाणी साचले आहे. सध्या शेतकरीवर्ग माळराणातील भात पिकांची कापणी व मळणी करण्यात गुंग झाला आहे. सध्या ग्रामीण भागात आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर दिला जात आहे. यंदा परतीच्या पावसामुळे लांबणीवर पडलेली सुगी पावसाच्या विश्रांतीमुळे सर्वत्र एकदाच सुरू झाली असल्याने मजुरांची मोठय़ा प्रमाणात कमतरता भासत आहे. यामुळे काही शेतकरी मशीनच्या साहाय्याने भात कापणी करत आहेत. मळणीचे काम ट्रक्टरच्या साहाय्याने केले जात आहे. व भाताला वारे देण्याचेही काम मशीनच्या साहाय्याने केले जात आहे. सध्या शेतकरी वर्ग यंत्राच्या साहाय्याने सुगीची कामे करून घेऊन हातातोंडाला आलेला घास पदरी पाडून घेण्यासाठी धावपळ करत आहे.
येथील शेतवडीत इंद्रायणी, दोडगा, शुभांगी, सोना मसुरी, तीनशे बारा, इंटाण व इतर नवीन जातीच्या भाताची लागवड केली आहे. सध्या निम्म्या भात पिकांची मळणी झाली आहे. व उर्वरित भात पिकांची कापणी व मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. या भागात भात कापणी बरोबरच रताळी काढण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. बैलूर भागात रताळय़ाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे भात पिकाची कापणी व मळणी यासारखी कामे लवकर उरकून घेण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. बैलूर भागातील सुगीची कामे डिसेंबर अखेर ते जानेवारी महिन्यापर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे.