खानापूर/ वार्ताहर: तालुक्यातील बैलूर येथे कर्ज बाजारीपणा आणि आजाराला कंटाळून शेतकऱ्याने शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. पावणू सातेरी तोराळकर (वय 52)रा, बैलूर असे त्यांचे नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, पावणू यांच्यावर कर्जाचा बोजा झाला होता. त्याशिवाय गेल्या कांही महिन्यांपासून ते आजारी होते. उपचारासाठी खर्च वाढत असतांना पतसंस्थांनी कर्ज वसुलीसाठी धोशा लावल्यामुळे ते चिंतेत होते. सकाळी शिवारात जातो असे सांगून ते घराबाहेर पडले. बराच वेळ ते घरी न परतल्यामुळे मुलगा शिवारात जाऊन पाहतो, तर त्यांनी दोरीने काजूच्या झाडाला गळफास घेतला होता. त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जांबोटी येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
येथील सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. खानापूर पोलिसांत घटनेची नोंद झाली असून उपनिरीक्षक बसगौडा पाटील अधिक तपास करीत आहेत. शेतकरी आत्महत्येचे लोण तालुक्याच्या पश्चिम भागात पोहचल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Previous Articleकराड जनता बँकेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचा ठिय्या
Next Article घर भाडय़ाने देताना…
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.