ग्रा. पं. सदस्याची उडाली घाबरगुंडी
वार्ताहर/ बैलूर
बैलूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पंडवाचे माळ येथे दोन वाघांचे दर्शन झाल्याने रस्त्यावरून जाणाऱया ग्राम पंचायत सदस्याची घाबरगुंडी उडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजता घडली. वाघांना पाहताच ग्राम पंचायत सदस्य शंकर रामू गावस मोठय़ाने किंचाळल्याने दोन्ही वाघांनी आपली दिशा बदलली. त्यामुळे ते बालबाल बचावले.
शंकर गावस हे मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपली बैलजोडी घेऊन गावाकडे परत येत होते. त्याचक्षणी अचानक आलेल्या दोन वाघांनी बैलांवर झडप घालताच त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यामुळे ते जोराने किंचाळले. त्यामुळे वाघांनी आपली दिशा बदलली. त्यानंतर अर्ध्या तासात शेतकरी नारायण राणू कणकुंबकर व त्यांची पत्नी दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांनाही या दोन वाघांचे दर्शन घडले. या दोन वाघांनी एका उडीतच रस्ता पार केला, हे दृश्य पाहून नारायण कणकुंबकर भयभीत झाले. त्यांनी आपल्या गाडीचा वेग वाढवून गाव गाठले. या घटनेमुळे गावातील शेतकऱयांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गावापासून दोन-अडीच किलोमीटर अंतरावरील पंडवाचे माळ, बेनसमर्डी, फुलूबाई मलप्रभा नदीच्या पायथ्याशी असलेले न्हईचे शेत या भागात येथील शेतकऱयांची शेती असून दररोज ते शेताकडे ये-जा करतात. मात्र, या भागात वाघांचा वावर असल्याचा अंदाज त्यांना येत नाही. मात्र, मंगळवारी आकस्मिक वाघांची जोडी समोर दिसल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनाधिकाऱयांनी पंडवाचे माळ भागामध्ये सापळा रचून वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांमधून होत आहे.