पंजाबमध्ये कोरोनाचे आतापर्यंत 170 रुग्ण सापडले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीत शेतकरी वगळता अन्य कुणालाच सूट देण्यात आलेली नाही. बैसाखीच्या दिवशी शेत अन् गुरुद्वारांमध्ये गिद्दा-भांगडा तसेच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल नसल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला असून सर्वत्र शुकशुकाट आहे.
पंजाबमध्ये धार्मिक तसेच शेतकऱयांसाठी आर्थिकदृष्टय़ा बैसाखीपेक्षा अधिक महत्त्वाचा दिवस नाही. शिख पंथासाठी याहून मोठा सण नाही, तरीही यंदा सर्वत्र बेरंग दिसून येतोय. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून लोकांना घरात राहून जप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
13 एप्रिल 1919 रोजी जालियांवाला बागमध्ये इंग्रजांकडून स्वातंत्र्यसैनिकांचे शिरकाण करण्यात आले होते. सोमवारी या घटनेला 101 वर्षे पूर्ण झाली आहेत. तेथे दरवर्षी मोठा मेळा आयोजित केला जातो आणि याला देशविदेशातून पर्यटक हजेरी लावत असतात. परंतु यंदा पहिल्यांदाच अशाप्रकारचा कुठलाच कार्यक्रम झालेला नाही.
कंबाइन हार्वेस्टरची मदत
पिकांची कापणी करण्याचे मोठे आव्हान शेतकऱयांसमोर आहे. दरवर्षी सुमारे 4 लाख मजूर अन्य राज्यांमधून दाखल होत असतात. परंतु यंदा मजुरांच्या अभावाची समस्या आहे. याच कारणामुळे 7600 कंबाइन आणि 3900 स्ट्रॉ रीपर (पिक उचलणारे यंत्र) यांची मदत घेतली जाणार आहे.