प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा ते सह्याद्री नगरपर्यंतच्या बॉक्साईट रोडचे रूंदीकरण करण्यात आले आहे. सदर रस्ता रूंदीकरणाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले, मात्र येथील अरूंद पुलाचे बांधकाम करण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या या रस्त्यावर असलेला अरूंद पूल वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. रात्री अपघात होण्याची शक्मयता असल्याने अरूंद पुलाची रूंदी वाढविण्याची मागणी होत आहे.
बॉक्साईट रोडच्या रूंदीकरणाचे काम मागील तीन वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. हिंडलगा ते सहय़ाद्रीनगरपर्यंतच्या रस्ता रूंदीकरणाचे काम झाले नव्हते. हे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निधीची तरतूद करून रूंदीकरणास प्रारंभ केला होता. काम युद्धपातळीवर करून हा रस्ता 80 फुटाचा करण्यात आला आहे. रूंदीकरणा अंतर्गत ठिकठिकाणी असलेले पूल मोठे केले आहेत. रस्त्याची उंची वाढविली आहे. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक घातले आहेत. वर्षापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, मात्र हिंडलगा गावच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर असलेल्या पुलाची रूंदी वाढविली नाही. अरूंद पूल वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. पुलावरून वाहनचालकांना ये-जा करावी लागत आहे. अशातच हा धोकादायक पूल वाहनचालकांना अडचणीचा बनला आहे. वास्तविक पाहता डांबरीकरण करण्यापूर्वीच पुलाचे बांधकाम करण्याची गरज होती. पण निधी नसल्याचे कारण सांगून पूलाचे बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच परिसरात पथदीप नसल्याने अंधारात वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पुलाची रूंदी वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.