भारत-ऑस्ट्रेलिया आज दुसऱया लढतीत आमनेसामने, अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा, शुभमन गिल-सिराजला संधी रवींद्र जडेजाचे पुनरागमन
वृत्तसंस्था / मेलबर्न
भारतीय संघ आज (शनिवार दि. 26) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात आमनेसामने भिडेल, त्यावेळी सर्वप्रथम मालिकेतील पिछाडी भरुन काढण्याचे आव्हान संघासमोर असणार आहे. विराट पितृत्वाच्या रजेवर असल्याने त्याच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.
यापूर्वी, ऍडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसरा डाव 36 धावांमध्ये खुर्दा झाल्यानंतर भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर दुसऱया लढतीत तो उपलब्ध नसेल, हेही स्पष्ट झाले. पण, उदयोन्मुख सलामीवीर शुभमन गिल सलामीला फलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. एमसीजीवर दमदार कसोटी पदार्पणाचा त्याचा निर्धार असेल.
अनुभवी जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याऐवजी आणखी एक युवा खेळाडू मोहम्मद सिराजला त्याची जागा भरुन काढण्याची तात्पुरती जबाबदारी सोपवली गेली आहे. आता रहाणे कर्णधार या नात्याने त्याला कसा हाताळतो, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर टीम पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे आणखी मनोबल उंचावलेले असणे साहजिक आहे. त्यामुळे, भारतीय संघासमोरील आव्हान कडवे असेल, हे स्पष्ट आहे.
झगडणाऱया पृथ्वी शॉला वगळत शुभमन गिलला संधी दिली गेली असल्याने यामुळे देखील संघात जान भरली जाईल, अशी अपेक्षा गैर ठरु नये. गिल व मयांक अगरवाल सलामीला उतरु शकतात. याचप्रमाणे ऋषभ पंत देखील आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करण्यात यशस्वी ठरला तर ती भारताची जमेची बाजू ठरु शकते. यापूर्वी, 2018-19 मध्ये ऋषभ पंत धमाकेदार फॉर्ममध्ये होता. त्याने प्रतिस्पर्ध्यांना पळता भुई थोडी केली होती. पण, मागील वर्षभराच्या कालावधीत त्याने आपला फॉर्म गमावला. शिवाय, त्याचा आता आत्मविश्वासही खचला आहे.
जडेजाचे पुनरागमन
कन्कशन व धोंडशिरेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेल्या रवींद्र जडेजाचा भारतीय संघात समावेश असून त्याच्या अष्टपैलू खेळामुळे भारताला 5 गोलंदाज खेळवण्याची रणनीती अंमलात आणता येईल. हनुमा विहारीला फलंदाजीत बढती मिळू शकते तर केएल राहुलला अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आता विराट कोहलीची जागा भरुन काढणे कोणत्याही खेळाडूला शक्य नाही. पण, हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीत स्वतः बढतीवर येईल आणि आणखी जबाबदारी स्वीकारुन खेळेल, असे संकेत आहेत. कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा आणखी एकदा आपल्या धीरोदात्त खेळीच्या निर्धारानेच मैदानात उतरु शकेल. पण, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री पुजाराला धावगती थोडी वाढवण्याची सूचना निश्चितपणाने करु शकतात.
गोलंदाजीच्या आघाडीवर, शमीच्या गैरहजेरीत जसप्रित बुमराह व उमेश यादव यांच्याकडे मुख्य धुरा असेल तर युवा गोलंदाज सिराज क्रिकेटच्या या अव्वल प्रकारात स्वतःला आजमावून पाहणार आहे.
पॅट कमिन्स व जोश हॅझलवूडच्या भेदक माऱयासमोर तारांबळ उडालेल्या भारतीय संघाची खऱया अर्थाने ही आणखी एक लिटमस टेस्टच असणार आहे.