प्रतिनिधी / श्रीपूर
बोंडले ता.माळशिरस येथील उजनी उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेले पैलवान जयसिंग सुभाष जाधव (वय २१) यांना कालव्यातील पाण्याच्या खोलीचा व वेगाचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडण्याची व पाण्यात बेपत्ता होण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. सदर घटना बोंडले येथील जाधव वस्ती नजीक दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली असून रात्री उशिरापर्यंत केलेल्या शोधकार्यास अखेरपर्यंत यश आले नाही.
पै.जयसिंग जाधव हे कुर्डुवाडी येथील मोठ्या तालमीत सराव करीत होते. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे ते आपल्या घरी आले होते. उन्हाचा चटका वाढल्यामुळे घरातील व्यक्ती ज्ञानेश्वर जाधव व सचिन आवताडे हे कालव्यात पोहत असल्याचे पाहून पै.जयसिंग जाधव यांनीही पाण्यात उडी मारली. पै. जयसिंग जाधव यांना पोहता येत नसल्याची कल्पना पोहणार्यास नसल्याने व पै.जयसिंग जाधव यांना उजनी कालव्यातील पाण्याच्या खोलीचा व वेगाचा अंदाज न आल्याने त्याच्यावर पाण्यात बुडण्याची वेळ आली. या क्षणी पोहत असलेल्या ज्ञानेश्वर जाधव व सचिन आवताडे यांनाही पै.जयसिंग यांना पाण्याबाहेर काढण्यात अपयश आले. आणि यानंतर पै.जयसिंग यांचे शरीर देखील पोहणार्यास त्याठिकाणी आढळून आले नाही. या घटनेची बातमी परिसरात पसरताच बहुतांश युवकांनी पै.जयसिंग यांना उजनी कालव्यातील पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो ही अयशस्वी ठरत त्यांचा मृत्यु झाला.