महिला मोठय़ा संख्येने सहभागी, धरणाचे काम होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार
प्रतिनिधी/ सातारा
कष्टकरी जनता आहे. कष्टकरी जनतेला हक्काचे पाणी पाहिजे आहे. कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बेंडारवाडी धरण होवून शेतीला आणि पिण्याला पाणी मिळाले पाहिजे. याकरता जोपर्यंत धरण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे. पाणी हक्काच मिळाले पाहिजे. त्यासाठी हा लढा आहे. शासनाला जागे करण्याकरता मोर्चा काढण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या विराट मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. मोर्चाची सुरुवात जिल्हा परिषद मैदानापासून करण्यात आली. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी, आंदोलनकर्त्यांनी हातात या सरकारचे करायचे काय…खाली मुंडी वर पाय…बघताय काय सामिल व्हा…पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचा, देताय काय नाहीतर खुर्च्या खाली करा, चुकीची माहिती देणाऱया शासकीय अधिकाऱयाचा निषेध असो, झोपलेल्या शासनाला जाग करा बोंडारवाडी धरण निर्माण करा, अशी घोषवाक्य लिहिली होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले. डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी बोलताना म्हणाले, श्रमिक मुक्ती दलाने अनेक लढे लढले आहेत. सर्व लढे यशस्वी झालेले आहेत. हाही लढा जिंकल्यातच जमा आहे. ज्यावेळी ब्रिटीशांची सत्ता आपल्या देशावर होती. त्यावेळी जावली खोऱयातील कष्टकरी वर्ग हा कामानिमित्ताने शहरी भागात गेला. तोच आजही गावागावात आहे. पाणी नसल्याने शेती करून जगू शकत नाहीत म्हणून मुबई गेल्याशिवाय जमत नाही, अति पावसाच्या प्रदेशात ही शरमेची बाब आहे. स्वातंत्र मिळाले असले तरीही पूर्ण स्वातंत्र्य नाही. याच भागातील जनतेने ब्रिटीशांना घालवण्यासाठी रक्त सांडलं आहे. आताही पाण्याची चळवळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरु राहणार आहे. पाणी हवं की राजकारण हे आताच ठरवा. राजकारण बाजूला ठेवून पाण्यासाठी लढूयात, असे त्यांनी स्पष्ट केले.
जावलीकरांने केले होते चांगले नियोजन
जावली प्रतिष्ठान पुणे यांच्यासह जावलीतील सर्वच नेते मंडळींनी राजकीय जोडे बाहेर ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. अगदी नियोजन पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करण्यात आल्याचा प्रत्यय दिसून येत होता. जावली तालुक्यातील 54 गावांतील धरण हव या मागणीसाठी 23 ट्रव्हल्स, 60 चार चाकी गाडय़ा, 75 दुचाकीने आंदोलनकर्ते साताऱयात आले. अगदी आंदोलनकर्त्यांना पाणी देण्यासाठी जावलीतून दोन ट्रक्टर टँकर मागवले होते. पाण्याच्या बाटल्यांची एक गाडीही स्वतंत्र आणली होती. स्वयंसेवकांची नियुक्ती केलेली होती.
माजी आमदार सदाशिव सपकाळ, अमित कदम बसले डांबरावर
जावलीकरांच्या हितासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सर्वच पक्षीय कार्यकर्ते नेते सहभागी झाले होते. त्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमित कदम हेही सहभागी झाले होते. ते चक्क खाली डांबरावर बसले होते. जेव्हा भारत पाटणकर हे आपले मनोगत व्यक्त करत होते. त्यावेळी सदाभाऊ बोलण्यास उठले. तोच त्यांना पाटणकर म्हणाले, आपण येथे चर्चा करायला आलो नाही तर पाण्यासाठी लढायला आलो आहे, असे म्हणून त्यांना खाली बसवले. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा दिल्या.
टोप्या अन् टीशर्टवरही पाटणकर बोलले
आंदोलनकर्त्यांनी परिधान केलेल्या पांढऱया टोप्या अन् टीशर्ट पाहून डॉ. भारत पाटणकर हे भाषणाच्या सुरुवातीला भडकले. ते म्हणाले, ही गोष्ट नटायची नाही तर लढायची आहे. बॅड वाजवला, टोप्या घातल्या म्हणजे हा उत्सव सुरु नाही. हे दुख आहे आपले ते आपण मांडायला आलो आहे येथे, अशा शब्दात त्यांनी आंदोलनातील अतिउत्साही कार्यकर्त्यांना फटकारले.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतच जावलीकर असल्याने आंदोलनाला मोठी संख्या असणार हे गृहीत धरुन मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 13 अधिकारी, 122 कर्मचारी, 1 आर सीपीएफ पथक होते. यामध्ये शहर पोलीस ठा ण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, सातारा तालुका, बोरगाव, मेढा येथीलही अधिकारी उपस्थित होते.