ठाणे/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा निघाली आणि तीच सांगताही झाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत. त्यासाठी कामं करावी लागतात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंना नाव न घेता लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर येथे राणेंना अटक केली. यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मिळाला. त्यांनतर भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.
दरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना राणेंचे नाव न घेता टोला लगावला. प्रतापने ऑक्सिजन प्लांटचं जे काम केलं ते खरं काम. हे खरे आशीर्वाद. या कामातून जनतेचे आशीर्वाद मिळतात. नुसतं बोंबलून काही आशीर्वाद मिळत नाही. आशीर्वाद द्या हो… आशीर्वाद द्या हो… कशासाठी देऊ? काय नाही… असेच द्या… असे नाही आशीर्वाद मिळत. या कामातून आशीर्वाद मिळतात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.