राजकीय दबावातूनच पोलिसांच्या कारवाईचा आरोप, काँग्रेसच्या सात आमदारांनी दिली मुरगाव पोलीस स्थानकाला भेट
प्रतिनिधी / वास्को
वास्को बोगदा भागात रंगपंचमीच्यानिमित्ताने झालेल्या वादाचे भाजपा राजकीय भांडवल करीत असून या प्रकरणात नाहक कुणालाही गुंतवण्यात येत आहे. मुरगाव मतदारसंघात भाजपाला पराभव सहन झालेला नाही. त्यामुळे वचपा काढण्यात येत असून काँग्रेस असे राजकारण सहन करणार नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी रविवारी मुरगाव पोलीस स्थानकाला भेट देऊन अधिकाऱयांसमोर स्पष्ट केले. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नाचा त्यांनी निषेध केला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी बोगदा भागात रंगपंचमीच्या उत्साहात युवक नाचत असताना झालेल्या वादातून एकमेकांना मारहाण करण्यात आल्यानंतर त्या भागात त्या रात्री वातावरण तापले होते. मात्र, काही तासानंतर सर्व सुरळीत झाले. त्यानंतर शनिवारी दुपारी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपाच्या इतर नेत्यांना वास्कोत भेट देऊन या प्रकरणाची व जखमीची चौकशी केली होती. पोलिसांनी या मारहाण प्रकरणी 47 जणांविरूध्द गुन्हा नोंद करून 9 जणांना अटकही केली. यात बहुतेक जण काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने त्याला राजकीय रंग चढलेला आहे. काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, ऍड. कार्लुस फरेरा, युरी आलेमाव, ऍल्टन डिकॉस्ता, संकल्प आमोणकर, केदार नाईक व इतर नेत्यांनी रविवारी संध्याकाळी बोगदा पोलीस स्थानकाला भेट देऊन या घटने प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सलीम शेख व पोलीस निरीक्षक अजित उमर्ये यांच्याशी चौकशी केली. या प्रकरणात बऱयाच युवकांना नाहक गोवण्यात आलेले असल्याचे त्यांनी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. हा प्रकार योग्य नसून पोलिसांनी राजकीय दबावाखाली लोकांना त्रास देऊ नये असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
आमदार दिगंबर कामत, आमदा मायकल लोबो व आमदार कार्लुस फरेरा यांनी यासंबंधी माध्यमांशी बोलताना बोगदा येथे होळीच्या निमित्ताने घडलेले प्रकरण हा तेथील मयेकर आणि भगत अशा दोन कुटुंबातील असल्याचे स्पष्ट केले. त्या दोन कुटुंबांमधील भांडणाचे वाद यापूर्वीही काही वेळा मुरगाव पोलिसांपर्यंत आलेले आहेत. या दोन कुटुंबांमधील वादाला राजकीय रंग देण्यात आलेला आहे. उगाच विषय भडकावण्यात येत आहे. विरोधी कार्यकर्त्यांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपाला मुरगावचा पराभव सहन झालेला नाही. त्यामुळेच राग काढण्यासाठी नाहक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गोवण्यात आलेले आहे. अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयाने लगेच जामीनावर मुक्त केलेले असले तरी त्यांच्याविरूध्द लगेच दुसरी एफआयआर नोंद करण्याचे प्रयत्न होत आहे. हा प्रकार कायदय़ाला धरून नाही. स्थानिक युवकांच्या सतावणुकीच्या या प्रकाराचा आम्ही निषेध करीत असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले. तसेच असे प्रकार काँग्रेस सहन करणार नाही असेही स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय दबावतंत्र आहे. पोलीस दबावाखाली काम करीत आहेत असा आरोप उपस्थित आमदारांनी केला. असाच प्रकार केपे मतदारसंघात होत आहे. केपेचा पराभवही भाजापला सहन झालेला नाही. पराभवानंतर असे घडत राहिले तर लोकशाहीला अर्थ राहणार नाही. चुकीच्या पध्दतीने कुणाला अटक करू नका. अशा प्रकारांविरूध्द आम्ही कायदेशीररीत्या लढू असेही यावेळी आमदारांनी बजावले.
आमदार संकल्प आमोणकर यांनी यावेळी बोलताना पराभवानंतर विरोधकांकडून आपल्या कार्यकर्त्यांची नाहक कळ काढण्यात येत असून दोन कुटुंबातील वादाचाही बाऊ करण्यात येत आहे. मुरगावात आता पूर्वीसारखे सर्व लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. वादापेक्षा विकास करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्ययक असल्याचे त्यांनी सांगितले.