तपासणीत उघड, तहसीलदारांची माहिती
वार्ताहर / सावंतवाडी:
मुंबई-पुणे येथून मोठय़ा प्रमाणात चाकरमानी ई पास घेत दाखल होत आहेत. थेट होम क्वारंटाईनच्या पत्रासह ते आपल्या घरी जात आहेत. मात्र, ई पास बोगस असल्याचे निष्पन्न होत आहे. सावंतवाडी तालुक्यात जवळपास दहाहून अधिक ई पास बोगस आढळले आहेत. आतापर्यंत अनेक चाकरमानी बोगस ई पास घेत गावी क्वारंटाईन झाल्याचे दिसून आले आहे. चाकरमान्यांकडील ई पास चेक केल्यास त्याची माहिती दिसत नसल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
म्हात्रे म्हणाले, मुंबई-पुण्याहून आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक चाकरमानी ई-पासद्वारे गावी आले आहेत. अजूनही येत आहेत. काहींकडील ई पास बोगस असल्याचे तपासणीत आढळले आहेत. मुंबई पोलिसांच्या नावे खोटे पास घेऊन काहीजण गावी थेट क्वारंटाईन होत आहेत. सावंतवाडीत सोमवारी 63 जण दाखल झाले, असे प्रभारी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांनी स्पष्ट केले.
चराठा सरपंचांची नगराध्यक्षांकडे मागणी
सावंतवाडीपासून जवळ असलेल्या चराठा, माजगाव, कोलगाव, कारिवडे या गावात मोठय़ा प्रमाणात मुंबई-पुणेकर चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र, तेथील शाळा व अन्य इमारतींमध्ये क्वारंटाईन संख्या पूर्ण झाली आहे. चराठा सरपंच बाळू वाळके यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांना निवेदन देत गावात येणाऱया चाकरमान्यांना शहरात क्वारंटाईन होण्यासाठी जागा उपलब्ध करावी, अशी विनंती केली आहे. चराठा गावात एकमेव प्राथमिक शाळा आहे. तेथे क्वारंटाईनची संख्या पूर्ण झाली असून आजही चाकरमानी दाखल होत आहेत. त्यांना क्वारंटाईन करायचे कोठे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शहरात क्वारंटाईनसाठी जागा द्यावी, अशी मागणी केली आहे.