737 रेशनकार्डे रद्द : 102 जणांकडून 3.54 लाखाचा दंड वसूल
वार्ताहर/ चिकोडी
चिकोडी व निपाणी तालुक्यातील बोगस रेशनकार्ड धारकांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन पुढे सरसावले होते. नोव्हेंबर महिन्यापासून बोगस रेशनकार्डे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार 737 रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. यातील 102 सरकारी सेवेतील रेशनकार्ड धारकांकडून 3 लाख 54 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
समाजातील गोरगरिबांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सरकारतर्फे रेशनकार्डे देण्यात आली. यापैकी बीपीएल रेशनकार्ड धारकांना शासकीय योजनांचा अधिक लाभ मिळण्याबरोबरच मोफत तांदूळही देण्यात येत आहे. बीपीएल व अंत्योदय रेशनकार्ड धारकांसाठी असलेल्या सुविधा लक्षात घेऊन अनेकांनी अपात्र असतानाही महसूल तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱयांना हाताशी धरुन बोगस रेशनकार्डे काढली. याचा वर्षानुवर्षे लाभही घेतला.
या बोगस रेशनकार्डमुळे होणारे मोठे नुकसान लक्षात घेऊन ज्यांच्याकडे बोगस बीपीएल व अंत्योदय कार्डे आढळून येतील त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अपात्र असल्यास संबंधितांनी स्वत:हून आपली रेशनकार्डे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार चिकोडी व निपाणी तालुक्यातील अपात्र रेशकार्डधारकांना रेशनकार्डे परत करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. 635 जणांनी आपली रेशनकार्डे परत केली असल्याने त्यांच्याकडून कोणताही दंड वसूल करण्यात आला नाही.
विविध सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या अपात्र रेशनकार्डधारकांनी वेळेचे बंधन झुगारुन गरिबांसाठी असलेल्या रेशनचा लाभ घेत होते. अशा 102 अपात्र रेशकार्ड धारकांकडून तब्बल 3 लाख 54 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केल्याने अपात्रांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अजूनही जवळपास 30 ते 40 टक्के अपात्र कार्डधारक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षभरामध्ये 6157 जणांनी नवीन रेशनकार्डसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 4790 जणांना रेशनकार्ड देण्यात आले असून 1156 जणांची कार्डे बाकी आहेत. ती लवकरच देण्यात येणार आहेत.