गाझियाबाद येथील ध्रुवी गुप्ता नामक विद्यार्थिनीने कागदापासून टुथब्रशची निर्मिती केली असून हा ब्रश पर्यावरणस्नेही आहे. तो नेहमीच्या उपयोगासाठी उपयुक्त तर आहेच पण प्रवासात उपयोगात आणण्यासाठी अधिक सुलभ आहे. त्याने दात घासल्यानंतर फारशा चुळा भराव्या लागत नाहीत. त्यामुळे प्रवासात पाण्याची बचत मोठय़ा प्रमाणात होऊ शकते. तसेच प्रवासात तोंड धुण्यासाठी स्वच्छ पाणी कित्येकदा मिळत नाही. अशावेळी हा ब्रश अधिक उपयुक्त ठरतो, असे तो उपयोगात आणलेल्यांचा अनुभव आहे. या ब्रशला टोकदार केस नसल्याने हिरडय़ांना कोणतीही दुखापत होत नाही, तसेच दातांमधून रक्तही येत नाही, असे याचे इतर लाभ आहेत, असे ध्रुवी यांनी स्पष्ट केले आहे.
हा ब्रश बोटावर बसवून अगदी मोजक्या पाण्यात दात स्वच्छ करता येतात. त्याची निर्मिती वनस्पतींपासून निर्माण होणाऱया कागदापासून पेलेली आहे. हा कागद स्वस्त मिळतो त्यामुळे हा ब्रशही वाजवी दरात उपलब्ध होऊ शकतो. तो पर्स किंवा पाकिटातही सुरक्षितरित्या ठेवला जाऊ शकतो.
मुख्य म्हणजे या ब्रशला औद्योगिक आणि अनुसंधान परिषदेकडून तसेच भारतीय विषविज्ञान अनुसंधान संस्थेकडून पुरस्कार देण्यात आलेले आहेत. शिवाय त्याला केंद्र सरकारचे डिझाईन पेटंटही मिळाले आहे. त्यामुळे लवकरच तो बाजारात सर्वत्र उपलब्ध होऊ शकणार आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर त्याची निर्मिती करण्यात यश आले आहे. सातव्या इयत्तेत असताना ध्रुवी प्रवास करत असताना नेहमीचा टुथब्रश तिच्या हातातून निसटून कपडय़ांवर पडला होता. या एका अगदी क्षुल्लक घटनेने तिच्यातील संशोधक जागा झाला आणि तिने हातातून न निसटणारा आणि बोटावर बसविता येणारा ब्रश तयार करण्याचा चंग बांधला असे ती स्वतः सांगते. आता या अभिनव टुथब्रशची मोठय़ा प्रमाणात विक्री करण्याचा तिचा विचार असून त्यादृष्टीने ती सज्जता करीत आहे.