विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मागणी
प्रतिनिधी / पणजी
देशात तसेच परदेशात विविध ठिकाणी बोटीवर अडकून पडलेल्या सुमारे 21000 भारतीय कर्मचारी खलाशांना देशात आपापल्या राज्यात घरी परत येण्यासाठी पावले उचलावीत आणि तशा सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. त्यामध्ये सुमारे 7000 पेक्षा अधिक गोमंतकीयांचा समावेश असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले आहे.
जगभरात भारतासह सुमारे 200 बोटीवर हे खलाशी कर्मचारी अडकून पडले असून त्यांना मायदेशात आणण्यासाठी सध्या कोणतीच सोय नाही. परिणामी त्यांचे देशातील गोव्यातील नातेवाईक चिंतेत असून ते परत येण्याची वाट पाहत आहेत. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे परत येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. ते कोणत्या परिस्थितीत आहेत हे देखील कळायला मार्ग नसून अनेकांचा संपर्क तुटलेला आहे आणि प्रयत्न करूनही तो होत नाही म्हणून आपण हस्तक्षेप करावा अशी याचना कामत यांनी पत्रातून केली आहे.
गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांच्याकडे हा विषय नेण्यात आला असून त्यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. बोटींचा तपशील तेथील कर्मचारी खलाशी यांचा तपशील ई मेलने कळविण्यात आला असून त्यांची दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत असे पत्रातून म्हटले आहे.