अमरावती/प्रतिनिधी
अमरावतीमधील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये ११ जण बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतरांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. बेनोडा पोलीस स्टेशन ( जि. अमरावती) च्या हद्दीत आज मंगळवार आज सकाळी ११.४५ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
“नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या संगमवार हे ठिकाणी आहे. झुंज या पर्यटन क्षेत्रावर या महिन्यात हजारो भाविक येत असतात. हे ११ जण नरखेड तालुक्यातील झुंज येथे फिरायला आले होते. हे सर्वजण तारासावगा, गाडेगाव, हातूर्णा येथील भाविक होते. दर्शनासाठी आल्यानंतर ते होडीत बसले असता होडी पलटी झाल्यामुळे ११ जण नदीत बुडाले. त्यात महिलांचासुद्धा समावेश आहे. त्यातील तिघांचा मृतदेह सापडला असून बाकीच्यांचा शोध घेणे सुरू आहे. घटनास्थळी वरुड, बेनोडा हातूर्णा वरुड, जलालखेडा पोलीस दाखल झाले असून स्थानिकांनीही धाव घेतली आहे.
स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. “वर्धा नदीच्या तिरावर ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनासह स्थानिक लोक उपस्थित आहेत. यामध्ये ११ जण बुडाले असून तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहे. यात एका तीन वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. तर एक पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे,” असे स्थानिक आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.