आसाममध्ये शांतीचे नवे पर्व : 50 वर्षांपासूनच्या संघर्षावर तोडगा : 1550 नक्षलींचे 30रोजी आत्मसमर्पण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘बोडोलँड’प्रश्नी सोमवारी केंद्र सरकारने आसाममधील नॅशनल डेमोक्रेटिक प्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) या नक्षलवादी संघटनेबरोबर शांती करार केला. त्यानुसार या संघटनेचे 1 हजार 550 नक्षली 30 जानेवारी रोजी आत्मसमर्पण करतील. केंद्र आणि आसाम सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असणाऱया याप्रश्नी तोडगा निघाला आहे. या ऐतिहासिक करारामुळे आसाममध्ये शांतीचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सोमवारी बोडो नक्षलवाद्यांच्या प्रतिनिधींनी त्रिपक्षीय शांती करारावर स्वाक्षरी केल्या. एनडीएफबीचे 1 हजार 550 नक्षलवादी 30 जानेवारी रोजी आत्मसमर्पण करतील. आसाम आणि बोडो नागरिकांसाठी हा करार सुवर्ण भविष्याची नांदी ठरेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. दरम्यान, या शांती करारास बोडोलँड क्षेत्रीय परिषद या संघटनेने विरोध केला आहे. बंदमुळे आसाममधील कोक्राझार, चिरांग, बक्सा आणि उदल्लगुडी या चार जिल्हय़ांतील जनजीवन प्रभावित झाले आहे.
बोडोंना मिळणार राजकीय अधिकार, आर्थिक पॅकेज
शांती करारानुसार बोडो आदिवासींना विशेष राजकीय अधिकारी आणि समुदायाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्यात येणार आहे. आसाम राज्याचे अखंडत्व कायम ठेवत बोडो आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारने ही विशेष तरतूद केली आहे. यामुळे बोडो बहुल जिल्हय़ांमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होण्यास मदत होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
खालील चौकट करणे
‘बोडोलँड’साठी रक्तरंजित संघर्ष,
आतापर्यंत 2,823 जणांचा बळी
बोडो हा आसाममधील सर्वात मोठा आदिवासी समुदाय. राज्यातील कोक्राझार, चिरांग, बक्सा आणि उदल्लगुडी या जिल्हय़ांमध्ये या जमातीचे वर्चस्व आहे. लोअर असाम अशी भौगोलिक ओळख असणाऱया या प्रदेशाची स्वतंत्र बोडालँड राज्याची मागणी 70च्या दशकात जोर धरू लागली. बोडोंचे वास्तव्य असणारे या चार जिल्हय़ांना बोडो टेरिटरियल कौन्सिल (बीटीसी) म्हणूनही ओळखले जाते. ‘एनडीएफबी’ने स्वतंत्र बोडोलँड मागणीचे नेतृत्त्व केले. 1987 मध्ये ऑल बोडो स्टुटंड युनियनेही स्वतंत्र राज्याच्या मागणी करत राज्याचे 50 टक्के क्षेत्रफळावर हक्क सांगितला. भूमिपुत्र असणारे बोडो आदिवासी व बांगलादेशमधून घुसखोरी केलेले स्थलातंरीत नागरिक यांच्यातील संघर्ष हाही या जिल्हय़ांमधील हिंसाचाराला कारणीभूत ठरला होता. 2012 मध्ये झालेल्या हिंसाचारात शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल 5 लाख नागरिक विस्थापित झाले होते. डिसेंबर 2014 मध्ये कोक्राझार आणि सोनितपूरमध्ये 30 नागरिकांची हत्या करण्यात आली होती. बोडो नक्षलींच्या हिंसाचारात आतापर्यंत 2 हजार 823 जणांचा बळी गेला आहे. 2002 मध्ये भूतान आणि भारत सरकारने संयुक्पणे राबविलेल्या लष्करी मोहिमेत ‘एनडीएफबी’ संघटनेला मोठा झटका बसला होता.
आजचा दिवस भारतासाठी विशेष : पंतप्रधान
शांती करारामुळे आसाममध्ये शांती, सद्भावना आणि एकात्मतेची नवी पहाट उगवेल. बोडो नागरिकांच्या अनोख्या संस्कृतीचे रक्षण होईल. तसेच विकासाचे नवे पर्व अवतरेल. शांती करारामुळे आजचा दिवस भारतीयांसाठी विशेष ठरला आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती कराराचे स्वागत ट्विटरच्या माध्यमातून केले.