भारताच्या सीमेवर पाकिस्तान आणि चीन हे आपले दोन उपद्रवी शेजारी देश नेहमी कुरापती काढत असतात, हे आपल्याला परिचयाचे आहे. तथापि आता, नेपाळ या ‘भारताचा परममित्र’ म्हणून (एकेकाळी) ओळखल्या जाणाऱया देशानेही भारताची कळ काढण्यास प्रारंभ करणे ही बाब निश्चितच गंभीर आहे. लडाखच्या काली नदीच्या आसपासच्या प्रदेशावर नेपाळने त्याचा अधिकार सांगण्यास सुरुवात केली आहे. हा साधारणपणे 379 चौरस किलोमीटरचा प्रदेश नेपाळने नुकताच त्याच्या नकाशात अंतर्भूत करून आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले. भारताने लगोलग नेपाळला या आगाऊपणासाठी कठोर शब्दांमध्ये समज दिली आणि हा प्रदेश भारताचाच आहे, हे ठासून सांगितले. तथापि, मुळात हा वाद काय आहे आणि तो आत्ताच का उपस्थित झाला याचा बोध करून घेणे आवश्यक आहे. भारतातील आणि जगातीलही हिंदूधर्मियांसाठी पवित्र असणारा आणि चीनच्या ताब्यात असणाऱया कैलाश मानसरोवर प्रदेश या भागापासून जवळ आहे. या तीर्थस्थळाची यात्रा करणे भारतीयांना सुलभ व्हावे, यासाठी भारताने काली नदीच्या परिसरात पक्क्या रस्त्याचे बांधकाम केले आहे. रस्ता भारताच्याच अधिकार क्षेत्रात आहे. तरीही नेपाळने भारत घुसखोरी करीत असल्याचा कांगावा चालविला आहे. भारताने ‘बळकावलेला’ हा भाग परत मिळवू अशी व्यर्थ वल्गनाही त्या देशाने केली. इतिहासावर दृष्टिक्षेप टाकला असता हा भाग 19 व्या शतकाच्या प्रारंभीच एका लेखी कराराद्वारे भारताचा झाला असल्याचे दिसून येते. नंतर 1960 च्या आसपास नेपाळ व भारतात या भागावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आज साठ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा नेपाळला तो उकरून काढावासा वाटत आहे. बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. नेपाळ हा भूमीवेष्ठित (लँडलॉक्ड) देश आहे. त्याला स्वतःची सागरी सीमा नाही. परिणामी, सागरी व्यापारासाठी त्याला इतके दिवस भारतावर अवलंबून रहावे लागत होते. नेपाळची सागरी आयात-निर्यात भारताच्या सहाय्याने पश्चिम बंगालमधील बंदरांमधून होत होती व आजही होत आहे. तथापि, आता परिस्थिती बरीच बदलली आहे. चीनने त्याच्या पूर्व सागरतटापासून नेपाळपर्यंत रेल्वेमार्ग आणि रस्ते बांधण्यास 15 वर्षांपूर्वीच प्रारंभ केला होता. आता वाहतुकीचे हे मार्ग जवळपास पूर्ण होत आले असल्याचे सांगण्यात येते. तसेच चीनने आपली चार बंदरे नेपाळला सागरी व्यापार करण्यासाठी उपयोगात आणण्याची मुभा दिली आहे. साहजिकच, भारतावर असलेले नेपाळचे अवलंबित्व कमी झाले असून त्याला चीनच्या रूपाने पर्याय मिळाला आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये चीनने जी प्रचंड आर्थिक प्रगती केली, त्यामुळे त्या देशाजवळ आज बख्खळ संपत्ती जमा झाली आहे. त्या जोरावर तो आपल्या आजूबाजूची छोटी आणि कमजोर राष्टे आपल्या कहय़ात घेत आहे. भविष्यकाळात चीनला भारताकडून जागतिक स्तरावर तीव्र स्पर्धा होऊ शकते. त्यामुळे भारताला जखडून ठेवण्यावर त्या देशाचा भर आहे. म्हणून भारताच्या भोवती चीन आपल्या अंकित देशांची साखळी तयार करीत आहे. पाकिस्तानची स्थिती आज जणू चीनचाच एक प्रांत असल्याप्रमाणे आहे. याशिवाय श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार (ब्रह्मदेश), मालदीव इत्यादी देशांनाही अमाप संपत्तीच्या जोरावर आपल्या बाजूला वळवून भारताची कोंडी करण्याचे प्रयत्न चीनने चालविलेले आहेत. नेपाळमध्ये सध्या चीनला अनुकूल सरकार आहे. त्यामुळे चीनच्या ओंजळीने पाणी पिण्यात तो देश धन्यता मानताना दिसतो. तेव्हा आज नेपाळने भारताबरोबर जो वाद उपस्थित केला आहे, तो केवळ त्याच्या एकटय़ाच्या जीवावर नव्हे तर त्याच्या पाठीशी त्याचा नवा ‘भाऊ’ चीन उभा आहे, हे उघड ंगुपित आहे. म्हणूनच भारतासाठी ही ताजी घटना भविष्यातील गंभीर इशारा ठरते. भारत एका बाजूला कोरोना संकटाशी झुंजत असताना चीन, पाकिस्तानपाठोपाठ नेपाळनेही भारताच्या कुरापती काढण्यास प्रारंभ करणे हा केवळ योगायोग नसून ते कारस्थान असल्याचा संशय बळावल्याखेरीच रहात नाही. तसेच या परिस्थितीला एक प्रकारे भारताचीही स्वातंत्र्यापासूनची ढिसाळ, निष्काळजी आणि स्वप्नाळू विदेश नीती तसेच संरक्षण नीतीही कारणीभूत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. नेपाळ कायम आपल्या बाजूचा राहील, कारण तो व्यापारासाठी आपल्यावर अवलंबून आहे, अशा भ्रमात भारत सुरुवातीची अनेक दशके राहिला. चीनच्या पूर्व सागरतटापासून नेपाळपर्यंत वाहतुकीचे मार्ग भविष्यात बांधले जातील असे कदाचित भारताच्या त्यावेळी स्वप्नातही आले नसावे. तसेच चीनच्या कधीही न संपणाऱया राक्षसी महत्त्वाकांक्षेची जाणीवही भारताने (अनेक वाईट अनुभव येऊनही) करून घेतली नाही. आपण शांततावादी आहोत. आपण कोणाचेही काही बिघडवत नाही. मग आपल्याला कोण कशाला त्रास देईल ? अशा बाळबोध (खरे तर भोळसट) संकल्पनांवर आधारित आपले संरक्षण आणि विदेश धोरण स्वातंत्र्यापासून होते. त्यातच आपण धन्यता मानत होतो आणि आत्मवंचना करून घेत होतो. या स्वप्नाळूपणानेच आपला घात केला आहे. काळ क्रूर असतो. बेसावधपणाला तो कधीही क्षमा करीत नाही. म्हणून आज ऐन खिंडीत पकडल्यासारखी आपली अवस्था आहे. प्रारंभापासूनच वस्तुनिष्ठ आणि व्यवहारी धोरणे स्वीकारली असती तर आज ही वेळ आली नसती. पण आजही वेळ पूर्णपणे गेलेली आहे असे नव्हे. अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी आवश्यक ती पावले तातडीने आणि कठोरपणे उचलली आणि त्यायोगे संरक्षण व्यवस्थाही बळकट केली तर कोणाचीही आपल्याला त्रास देण्याची हिंमत होणार नाही. आपल्याकडे तेवढी मानवबळ क्षमता निश्चितच आहे. पण ती दिसून येण्यासाठी आत्मविश्वासपूर्ण व व्यवहारी धोरणाची आवश्यकता आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर हा आत्मविश्वास काही प्रमाणात का असेना पण दाखविण्यास प्रारंभ केला आहे. त्याला सर्वांचे सहकार्य मिळणे आणि या धोरणात सातत्य राखणे आवश्यक आहे.
Previous Articleमिशिगन, नेवादाला इशारा
Next Article आजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मे 2020
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.