(अध्याय सहावा)
श्रीकृष्णाच्या रूपाने सावयव झालेल्या परब्रह्माचे दर्शन घेण्यासाठी समस्त देवलोक द्वारकेत दाखल झाला. भगवंतांच्या रूपाची विलक्षण भुरळ पडून त्यांनी त्यांची स्तुती सुरू केली. त्यातील काही भाग आपण मागील भागात पाहिला. आता पुढे, देवगण म्हणाले, यापूर्वी पुष्कळ अवतार झाले पण असे चरित्र झाले नाही. विधी व वेद यांना तू लाजवलेस. व्यभिचाऱयांना स्वतःच्या पायाशी आश्रय दिलास, तुझ्यावर अनेकजणींचे प्रेम जडले पण तू त्यांना निर्विषय केलेस. असा तुझा अधिकार! तुझी कीर्ती नुसती ऐकली, तरी माणूस पवित्र होतो. तुझ्या कीर्तीचे श्रवण करून आंतरमनाचे क्षालन होते. तुझ्या कीर्तनाने वृत्ती परम पावन होते. तुझ्या चरण तीर्थाने सकळ पातके भंग होतात आणि जग पवित्र होते. तुझ्या कीर्तनाचे श्रवण आणि पायाचे तीर्थ या दोन गोष्टींचे सेवन साधुजन अखंड करत असतात. त्यामुळे परम पावन होऊन त्यांची वृत्ती समाधानी होते. जे सत्यवादी साधु तुझ्या पायी आस लावून बसले होते. त्यांच्यासाठी तुम्ही धर्माची पुनःस्थापना केलीत आणि दश दिशांना तुमची उदार कीर्ती पसरवलीत. त्यामुळे त्रिखंड पावन केलेत.
परमभक्तीभावाने अशी स्तुती करून देवांनी गोविंदाला संतुष्ट केले. स्तुतीमुळे गोविंदाला आल्हाद वाटू लागला. अशा प्रकारे स्तुतिस्तोत्र गाऊन त्यांनी श्रीकृष्णाला संतुष्ट केले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, पातक्मयांचा पृथ्वीला झालेला भार कमी व्हावा तसेच सुरवरांचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही केलेल्या प्रार्थनेनुसार आपण कार्य केलेत. त्याहीपुढे जाऊन जे आम्हाला कळत नव्हते तेही आपण पूर्ण केलेत. स्वसामर्थ्याने धर्माची वृद्धी केलीत. गोवर्धन डाव्या हाताने उचललात. मुखाने वणवा प्राशून गोपाळांना वांचविलेत, मृत झालेल्या गुरुपुत्राला घेऊन आलात. देवकीचे गत झालेले गर्भ तिला भेटवलेत. गोपालवत्स होऊन विधात्याला भुलवलेत जगाच्या परम हितासाठी नाना चरित्रकथा करता झालात. श्रीअनंता कृष्णनाथा निजजनका तुमच्या अवतारकार्याचे किती आणि कसे वर्णन करू? जगाच्या हिताच्या अनेक गोष्टी आपण केल्यात. आता आपले वय सव्वाशे वर्षाचे झाले आहे. सर्व देवकार्यही पूर्ण झाले आहे. यादव कुळही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असे सर्व बोलून आपली आर्जवी मागणी समस्त देवलोकाच्यावतीने ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णाकडे केली. म्हणाले, ‘हे श्रीकृष्णा! आम्ही तुझ्या चरणांची इच्छा करत आहोत. जर उचित असेल तर या क्षणी निघावे. अशी या दासाची विनवणी मान्य करा. वैकुंठनाथा तुझ्या सेवेची आम्हा उमाकांत आदी सर्व देवांना मोठी उत्कंठा लागली आहे. मनमोहक हसून श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मदेवा तुझी भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे. सर्व कार्य मी पूर्ण केले खरे पण एक मोठा अडथळा अजून शिल्लक आहे तो म्हणजे, हे यादव सध्या वीर्य, शौर्य आणि वैभवाने ते माजले आहेत आणि धर्मनाशास तयार झाले आहेत. मी यांना सोडून निघून गेलो तर ते दुराचारी होतील. हे देवांना आवरणार नाहीत, दैत्य दानवांना आटोपणार नाहीत. मग तुम्ही पुन्हा यांना नष्ट करा म्हणून माझ्या मागे लागणार तेव्हा या सर्वांचा नाश करूनच मी वैकुंठास येईन.