अध्याय सतरावा
भगवंतांनी उद्धवाला सांगितले की, आपणहून स्वधर्माचे आचरण केले की, ते कर्मच ब्रह्मस्वरूप होते. हे ऐकल्यावर उद्धवाच्या मनात आले की, कल्पाच्या प्रारंभी भगवंतांनी सनकादिकांना उपदेश केला. त्या उपदेशाला फार काळ लोटून गेल्यामुळे तो उपदेश आता बहुतकरून कोणाच्या लक्षात राहिलेला नाही. सध्याच्या काळात बहुतेक लोक स्वधर्मामध्ये तत्पर नसतात. लोक स्वधर्माचा विचार विसरून जाऊन कामासक्ती व उदरपूर्ती यातच लुब्ध झाले आहेत. म्हणून त्याने भगवंतांना विनंती केली की, हे वैकुंठाधिपते ! मला स्वधर्माची नि÷ा तूच सांग. ब्रह्मदेवाच्या सभेत वेदादिक कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात, तेथे सुद्धा आपल्याखेरीज दुसरा कोणीही, आपला हा धर्म तयार करणारा, सांगणारा व त्याचे रक्षण करणारा नाही मग पृथ्वीवर कसा असेल? आता तर तुम्ही निजधामाला निघालात. हे मधुसूदना! या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे आणि उपदेशक असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावर हा लुप्त धर्म कोण सांगेल? ह्या जगामध्ये ज्याचे ज्ञान मायेने आच्छादलेले नाही, असा धर्मोपदेशक खरोखर तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. काही शास्त्रवचनाच्या मीमांसेने कर्माबद्दल प्रतिपादन कसे करायचे समजते पण तेच कर्म आचरणात कसे आणायचे ते मात्र त्यांनाही कळत नाही आणि म्हणूनच हे भगवंता! धर्माचा कर्ता, धर्माचा वक्ता आणि धर्माचा विस्तार करून त्याचे संरक्षण करणारा तुझ्यावाचून दुसरा असणेच शक्मय नाही. या लोकातच केवळ पाहू गेले तर, तुझ्यासारखा सर्वज्ञ कोणी नाही इतकेच नव्हे, तर विचारपूर्वक पाहिले असता तुझ्यासारखा उपदेशक त्रैलोक्मयातही दुसरा कोणी नाही. सत्यलोकाकडे पाहिले तर तेथे चारही वेद, षड्दर्शन, इतिहास, स्मृती, पुराणे ही मूर्तिमंत पुढे उभी राहिलेली असतात. तरीपण सनकादिकांच्या प्रश्नाचे उत्तर ब्रह्मदेवाला सांगता आले नाही. तेव्हा तू हंसरूपाने तेथे येऊन त्यांचे समाधान केलेस. ब्रह्मदेवाच्या सभेमध्येही तुझ्यासारखा वक्ता नाही तर मूर्तिमंत ब्रह्म आहेस तरीही केवळ भक्तांवर अनुग्रह करण्याकरिताच या लोकाच्या ठिकाणी अवतरला आहेस. नुसताच अवतरला आहेस असे नाही तर तू सर्व कर्मधर्माची स्थापना करून व त्यानुसार आचरण करूनही दाखविलेस. पण तू निजधामास गेल्यानंतर मग स्वधर्म सांगणारा कोण आहे? तात्पर्य हे श्रीकृष्णा ! भक्तीने युक्त असे स्वधर्माचे रहस्य यथार्थ रीतीने प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य तुजवाचून इतरांना नाही. तू जगज्जीवन भक्तांचा साहाय्यकर्ता आहेस, भक्तांच्या अभिमानरूपी मत्त हत्तीचे निर्दालन करणारा आहेस, म्हणूनच तुला ‘मधुसूदन’ असे म्हणतात. अशी प्रार्थना करून उद्धव बोलू लागला. तू सर्वज्ञ असून ज्ञानाची केवळ मूर्ती आहेस. ह्यास्तव मनुष्यांच्या कर्माची गती आणि वर्णाश्रमांच्या धर्मातील रहस्य यथार्थ रीतीने मला सांग. तसेच वर्णबाह्य लोकांचे कर्म व त्यांचा जो विहित धर्म, त्याचेही कथन करावे. ह्याप्रमाणे उद्धवाने श्रीकृष्णाची प्रार्थना केली, तेव्हा मेघश्याम श्रीकृष्ण संतुष्ट झाला. साऱयाच लोकांना हितावह असा उत्तम प्रश्न उद्धवाने केला, तो ऐकून महान् योगेश्वर शुकाचार्य देखील आनंदनिर्भर झाले. शुकाचार्य परीक्षितीला म्हणाले, उद्धवाची बुद्धी धन्य होय! कारण, त्याने श्रीकृष्णाची प्रार्थना करून साऱया जगावर उपकार करून ठेवला आहे. शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिती! सावधान चित्ताने ऐक. त्या उद्धवाचा प्रश्न खरोखरच धन्य होय. कारण त्याने स्वकर्मानेच मुक्ती विचारली. जो सर्व सेवकांमध्ये अत्यंत प्रिय व श्रीकृष्णाला अतिशय आवडता, ज्याच्याशिवाय श्रीकृष्णाला क्षणभरही मुळीच करमत नसे. आपली गुप्त गोष्ट श्रीकृष्ण नेहमी ज्याच्यापाशीच सांगत असे, आपले हितगुज श्रीकृष्ण ज्याच्यावाचून दुसऱया कोणापाशीच सांगत नसे. त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याला त्या रमावल्लभाने एक क्षणाचाही विलंब केला नाही. ब्रह्मदेवादिकांनाही जो दुर्लभ, तो परमात्मा त्या उद्धवाला अगदी सुलभ झाला होता.
क्रमशः