अध्याय चौदावा
भगवंत म्हणाले, माझा भक्त आत्मसुखाच्या माथ्यावर समभावनेने खेळत असतो. काम, क्रोध हे त्याच्या देहात पूर्ण मावळलेले असतात. त्यामुळे त्याच्या ठिकाणी खरी शांती राहत असते. त्याच्या पायांशी माझे आत्मसुख सदोदित लोळत राहते. त्याचे पाऊल ज्या ठिकाणी पडते, तेथे आत्मसुखाची खाणच उघडते.
तो दैवयोगाने ज्याला भेटतो, त्याला सुखाचाच दिवस सुरू होतो. समभावनेच्या सुखाने तो अंतर्बाह्य सुखरूप असतो. माझ्या ठिकाणी ज्याने स्वतःला समर्पित केले अशा भक्ताला, माझ्याशिवाय योगसिद्धी किंवा मोक्ष यांपैकी काहीही नको असते. इंद्राचे पद, ब्रह्मलोक, पाताळातील ऐषआराम, अमृतपान, ही सर्वच एकदम देण्यासाठी सर्व सिद्धी जरी आपण होऊन प्राप्त झाल्या किंवा ज्या महासिद्धी प्राप्त व्हाव्या म्हणून योगी नानाप्रकारच्या विधीने थकून जातात, त्या खरोखर पुढे येऊन उभ्या राहिल्या, तरी सदबुद्धीयुक्त भक्त त्यांना शिवत नाहीत. ह्या सिद्धींची कथा काय ? परंतु सलोकता, समीपता, किंवा माझे सारूप्य देणारी अशी सायुज्यता जरी त्यांना दिली, तरी माझे भक्त त्या सलोकतादी मुक्ती कधीही घेत नाहीत. जिच्या ठिकाणी काळाचीही सत्ता चालत नाही, जिच्यामध्ये जन्ममरणाची वार्ताही नाही, अशी माझी सायुज्यता मुक्ती भक्तांना देऊ लागलो तरी भक्त ती मुळीच घेत नाहीत. कारण भक्तीच्या सुखानेच त्यांची वृत्ती आनंदित झालेली असते, म्हणून चारही मुक्ती येऊन पाया पडू लागल्या, तरी ते भक्त माझ्याशिवाय काहीच स्वीकारायला तयार होत नाहीत. माझ्या भजनसुखाने त्यांचे महत्त्व एव्हढे वाढते की, ते तिन्ही लोकात न सामावण्याएवढे मोठे होतात. माझ्या भक्तांना माझ्या भजनातच अलौकिक आनंद वाटतो. कदाचित तू असं विचारशील की, मिळणारी सर्व सुखे, सिद्धी व मुक्ती लाथाडून तुझी भक्ती करणारे भक्त हे निखालस वेडे असावेत कारण त्यांना तुझ्या भजनाची आवड असते, परंतु तुला त्यांची आवड किंवा अतिशय गाढ प्रीती असेल हे काही पटत नाही. भक्त हे तुला गोचिडाप्रमाणे घट्ट पकडून बसू इच्छितात. जरी गोचडांना म्हैस आवडत असली तरी म्हशीला काही गोचडी आवडत नाही. त्याप्रमाणे भक्तांची प्रीती जरी तुझ्यावर असली तरी, तरी तुझे त्यांच्यावर प्रेम असेल अशी खात्री वाटत नाही. कारण देव, भजन आणि भजणारा असा भेद मायेमुळे निर्माण झालेला असल्याने, मिथ्या आहे. तेव्हां अशा मायायुक्त भजनमार्गामध्ये तुला प्रीती कशी असणार ? उद्धवाची शंका लक्षात घेऊन भगवंतांनी खुलासेवार उत्तर दिले. भगवंत म्हणाले, भजनामध्ये भक्तांची भक्ती शुद्ध असली, म्हणजे तेथे मलासुद्धा त्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते. जो जसा माझ्याशी वागतो, तसाच मी त्याच्याशी वागतो. भक्त माझ्या ठिकाणी अनन्य भक्ती ठेवतो, म्हणून मीही त्याच्यावर अनन्य भक्ती ठेवतो. माझ्या भक्तांचं माझ्यावर किती प्रेम आहे, हे मीच जाणतो. त्या प्रीतीच्या उपमेला त्रिभुवनात तोड नसते. माझ्या भक्तीने जो माझ्याशी अनन्य झाला, तेव्हाच त्याचे अज्ञान नाहीसे झाले असे समज. उद्धवा ! अशा भक्तांबद्दल मला जे प्रेम वाटत असतं, त्याबद्दल तुला किती सांगू ? ब्रह्मदेव हे तर माझ्याच पोटचे पोर आहे. त्याचे सर्व लाड मी पुरवितो पण भक्तांच्यासारखा फार मोठा प्रीतीकल्लोळ त्याच्या ठिकाणी नाही. मी ब्रह्मदेवाला कर्ममार्गाला लावले आणि भक्तांना निष्कर्मता दिली. म्हणूनच ब्रह्मदेवाने प्रार्थना केली तरी मी त्याच्याकडे न जाता, गवळय़ांच्याच घरचा भात खात बसलो. ब्रह्मदेवाला कमीपणा आणून मी वासरे व गोपाळ झालो. तात्पर्य, माझ्या भक्तांसारखी प्रीती मला ब्रह्मदेवाच्या ठिकाणीसुद्धा नाही. थोडक्मयात सांगायचे झाले तर ब्रह्मदेवापेक्षा मला भक्त प्रिय आहेत कारण मी ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीचे काम दिले पण त्या कामात तो इतका आसक्त झाला की, त्याचा परिणाम म्हणून तो मी दिलेली ब्रह्मविद्या सुध्दा विसरला हे मी तुला सांगितले आहेच त्याउलट माझे भक्त माझ्याकडून काहीही अपेक्षा न बाळगता, अत्यंतिक प्रेमाने मला जिंकून घेऊन माझ्या गळय़ातले ताईत बनलेले असतात.
क्रमशः