चीनमधील अंडरवॉटर भुयारापेक्षा अधिक असणार लांबी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पूर्व लडाखच्या गलवान खोऱयात चीनसोबतचा तणाव कमी करण्यासाठी सैन्य पातळीवर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशापासून आसामपर्यंत रस्तेवाहतूक मजबूत करण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत. केंद्र सरकारने ब्रह्मपुत्रा नदीखालून 14.85 किलोमीटर लांबीच्या भुयारनिर्मितीला तात्विकदृष्टय़ा मंजुरी दिली आहे. देशात नदीखालून निर्माण होणारे भुयार हे चीनच्या ताइहू सरोवराखाली निर्माण करण्यात आलेल्या भुयारापेक्षा अधिक लांबीचे असणार आहे.
केंद्र सरकारने आसामच्या गोहपूर (राष्ट्रीय महामार्ग-54) आणि नुमालीगढला (राष्ट्रीय महामार्ग-37) जोडण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीखालून चारपदरी भुयारी मार्ग तयार करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. भूपृष्ठ वाहतूक तसेच महामार्ग मंत्रालयाने अमेरिकेच्या कंपनीने तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या लुइस बर्जर कंपनीने ब्रह्मपुत्रा नदीखालून 14.85 किलोमीटर लांबीचे भुयार निर्माण करण्यासंबंधी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या भुयारातून सैन्यवाहने आणि शस्त्रसज्ज वाहनांना 80 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने प्रवास करता येणार आहे. हे भुयार आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. हे भुयार तयार करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून डिसेंबरमध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे.
चीनमध्ये 10.79 किमी लांबीचे भुयार
चीनच्या ताइहू सरोवराखालून 10.79 किलोमीटर लांबीचे एकच भुयार तयार केले जात आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीखालून तयार होणाऱया भुयारात येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असणार आहेत. भुयारात पाणी शिरू नये म्हणून सुरक्षेचे अनेक उपाय अवलंबिले जाणार आहेत.
भुयाराची वैशिष्टय़े
14 किलोमीटर लांबीचे भुयार निर्माण करणे आव्हानात्मक राहणार आहे. पाण्याखालून जाणाऱया भुयारात हवेचा दाब खूपच कमी राहणार आहे. अशा स्थितीत भुयारात हवा खेळती ठेवण्यासाठी व्हेंटिलेशन यंत्रणा, अग्निशमन सुविधा, प्रकाशाची व्यवस्था आणि आपत्कालीन मार्गाची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे.