अध्याय तेरावा
चित्त आणि विषयांचा वियोग कसा साधता येईल या सनकादिकांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले, माणसाच्या शरीरात मी आत्मरूपाने वसत असतो. हा आत्मा शरीराच्या हालचालींचा केवळ साक्षी असतो हे लक्षात घेतलं की, आत्म्याचा चित्त आणि विषय या दोन्हीशी काहीही संबंध नसतो हे लगेच पटते पण बुद्धी आत्म्याच्या बळावर करत असलेल्या संकल्पविकल्पामुळे आत्म्याला जीवपण लाभते आणि तो बुद्धीच्या तालावर नाचू लागतो. परिणामी आत्मस्वरूपाला विसरतो. म्हणून आत्म्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देणे हेच मनुष्य जन्मातील महत्वाचे काम आहे. पण मनुष्य स्वतःच्या जोरावर हे काम करू शकत नाही. हे अवघड काम केवळ सद्गुरुंच करू शकतात. असा सद्गुरूंचा महिमा थोर आहे. सद्गुरुकृपेने माझ्या स्वरूपाची गोडी जेव्हा साधकांना पूर्णपणे लागून राहिली की, त्यांच्या चित्तात केवळ मला स्थान असते. त्यामुळे तेथे विषयांना थारा मिळत नाही. म्हणून आपोआपच चित्तातून विषय निघून जातात. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर अंधार निमुटपणे चालता होतो किंवा देठाला लागून वाढलेली फळे पिकली की, देठापासून वेगळी होतात. देठही त्या फळांना धरून ठेवत नाही तसेच दही घुसळून लोणी काढले आणि ते पुन्हा ताकात घातले तर ते ताकापासून निराळे राहते. त्याप्रमाणे चित्त आणि विषय यांची फारकत होते. आणखी एक महत्त्वाचे सांगतो. माझे स्वरूप प्राप्त झाले असता दैव बलवत्तराने शिष्याला विषयोपभोग देऊ लागले, तरी त्याच्या चित्तात विषयवासना उत्पन्न होत नाही. कारण ते स्वभावतःच अलिप्त झालेले असते. उदाहरणार्थ एखाद्या साधुपुरुषाच्या ताटात अनेक पक्वान्ने वाढली तरी ती खाण्यात त्याला गोडी राहिलेली नसल्याने तो वाढणाऱयाचे समाधान करायचे म्हणून, एखादा पदार्थ चाखून पाहील किंवा फारच भूक लागली असेल तर सर्व पदार्थ एकत्र करून तो ते खाऊन टाकेल. कारण त्याला पदार्थांच्या चविढवीचे काहीच कौतुक नसते. जो ब्रह्मरसाचे सेवन करत असतो त्याला गुळवण्याचं काय कौतुक वाटणार ? असा हा सगळा प्रकार असतो. साधुपुरुषांच्या वर्तणुकीची अशी कित्येक उदाहरणे आहेत. म्हणून म्हणतो की, माझा योग साधून ब्रह्मरसाचे सेवन केले की, आपोआपच चित्त आणि विषय ह्यांचा सहजी वियोग होतो. पण ही गोष्ट स्वबळावर घडू शकत नाही म्हणून हे स्वरूप साधण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. कारण जे साधक स्वतःच स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांची अहंता नाडते. मी हे करू शकतो असा विचार माणसाचा अहंकार वाढवतो आणि अहंकारी स्वभाव बंधनाला कारण होतो. जेथे एक क्षणभर वस्ती होते, त्या ठिकाणाचासुद्धा मनुष्याला अभिमान चढतो. इतके अभिमानाचे व्यसन माणसाला घेरून टाकते. या अहंकारानेच आत्म्याच्या खऱया म्हणजे सच्चिदानंद रूपाचा लोप होतो. म्हणून सद्गुरु साधकाला उपदेश करून त्याचा अहंकार दूर होईल अशी साधना करायला सांगतात. ते म्हणतात, साधकाने निरिच्छ व्हावे म्हणजे तो आहे त्यात समाधान मिळवेल व विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेत राहील. कारण किंचितसा जरी अहंकार उत्पन्न झाला तरीदेखील बुद्धी पवित्र मनुष्यालाही मायाग्रस्त करून सोडते. अहंकार देहाच्या संगतीने प्रबळ झाला की, तत्काळ काहीतरी विरुद्ध परिणाम करतो. अहंकार खवळला असता तो आनंदाला संपवून टाकतो. त्यामुळे परमात्मस्फूर्तीचे स्फुरण नाहीसे होते आणि अभिमानामुळे देहाचा मीपणा मात्र वाढतो. हा मीपणा माणसाच्या हातून कोणतीही गैरकृत्ये सहजी घडवून आणतो. उदाहरण द्यायचं झालं तर, कासवीच्या पिलांची आईच्या नयनामृतानेच तृप्ती होत असते आईपासून त्या मुलाची चुकामूक झाली आणि मग त्याला भूक लागली म्हणजे ते चिखलच खाऊ लागते. कुठे कासवीचे नयनामृत आणि कुठे चिखल ! एकदा अवदसा आठवली की, सगळेच धुळीला मिळते त्याप्रमाणे आनंदाचा विकास थांबला की, जीवाची विषयासक्ती वाढते.
क्रमशः