अध्याय चोविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, त्रिगुणांची साम्यावस्था ढळली की, त्यात अहंकार उत्पन्न होतो. अहंकार विकारांना जन्म देतो. प्रथमतः सात्विक अहंकार उत्पन्न होत असून तो अंतःकरणाला प्रकाशित करतो. तोच अनेक देवतांमध्ये विकार उत्पन्न करणारा आहे, म्हणून त्याला ‘वैकारिक’ असे म्हणतात.
जो राजस अहंकार असतो, तो ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा प्रकाशक असतो. राजस तेजाचे विलास त्याला आवडतात, म्हणून त्याला तैजस असे म्हणतात. तामस अहंकाराचा परिणाम असा होतो की, तो सूक्ष्म परमाणुरूप भूतांना उत्पन्न करतो. म्हणून त्याला ‘भूतादि’ असे म्हणतात. अहंकाराची ताकद मोठी विलक्षण असते. ती सचेतनाला अचेतन बनवते. अहंकार ज्ञान-अज्ञानाची पक्की गाठ मारून मोठय़ा प्रेमाने स्वतःचे लग्न त्या गाठीशी लावतो. जीव हा ज्ञानस्वरूप आहे, त्याचे जड देहाशी लग्न होते आणि देह त्याला जड, मूढ व वेडा करून सोडतो. तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यापासून पंचमहाभूते उत्पन्न झाली. राजस अहंकारापासून इंद्रिये आणि सात्त्विक अहंकारापासून इंद्रियांच्या अधि÷ात्या अकरा देवता प्रगट झाल्या. तामसगुणाने ती पाच महाभूते परस्परांशी मिश्रण न करिता वेगवेगळी निर्माण केली आहेत. ती पंचमहाभूते विषयापासून उत्पन्न होतात.
पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकारचे अहंकार आहेत. त्या तिन्हीपासून देह निर्माण होतो. कान इत्यादि दहा इंद्रिये ही राजस अहंकारापासून आपोआपच उत्पन्न होतात. सात्विक अहंकाराच्या विकारांपासून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असा चित्तचतुष्टय़ाचा चमत्कार उत्पन्न होतो आणि प्रजापती-इंद्रादि अकरा देव इंद्रियांचे अधि÷ाते होतात. तीन प्रकारच्या अहंकारवृत्ती गुणांच्या प्रभावाने क्रियाशील शक्ती होतात. याप्रमाणे ब्रह्मांडाची सर्व रचना झाली आहे. या मागे माझीच प्रेरणा आहे. माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यातून ब्रह्मांडरूप अंडे उत्पन्न झाले. हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे. पंचमहाभूतांमध्ये एकमेकात वैरच असते. पाणी पृथ्वीला गिळून टाकावयाला धावत असते. तेज (अग्नि) त्या पाण्याचा खात्रीने नाश करते. तेजाला वायु गिळून टाकतो. वायूला आकाश गिळून टाकते. ह्याप्रमाणे भूतांचे एकमेकांशी मुळीच सख्य असत नाही. त्यांच्यातील वैरभावाला आळा घालण्यासाठी त्यांच्यात मी अंतःकरणरूपाने स्वतः प्रवेश करून त्यांचे एकत्रीकरण करतो. त्यामुळे ती माझ्या नियंत्रणात येतात आणि त्यांच्यात आपोआपच सामंजस्य नांदते. मी मर्यादेची रेषा घालून दिल्यामुळे पाणी पृथ्वीला विरवून टाकू शकत नाही. तेजही आपले शोषणक्रियेचे नख उदकाला लावण्याकरिता पुढे येत नाही
तसेच वायु तेजाला गिळून टाकीत नाही. वायु कितीही त्याच्या मनासारखा वागत असला तरी आकाश त्याला कधीच गिळत नाही किंवा त्याच्या गतीला प्रतिबंध करीत नाही. अशी मी प्रतिबंधित केलेल्या सर्व महाभुतांनी एकत्र येऊन मला महापुरुषाला राहण्यासाठी मोठमोठाल्या सप्त आवरणांसह प्रशस्त जागा व्यापून अंडय़ाच्या आकाराचे ब्रह्मांड निर्माण केले आहे. जेव्हा हे ब्रह्मांडरूप अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले, तेव्हा मीच नारायणरूपाने त्यात विराजमान झालो. मी स्वतः विश्वात्मा नारायण आहे. माझ्या लीलेने मी देहधारी झालो. माझ्या नाभीमध्ये विश्वाला आधारभूत असे नाभिकमल उत्पन्न झाले आणि त्यात उत्तमोत्तम असा ‘आत्मभू’ नामक ब्रह्मदेव जन्मास आला. तो सामान्यजनांप्रमाणे उदरात गर्भरूपाने राहून योनिद्वारा जन्मलेला नसून, माझ्या आत्म्यापासून स्वयंभूच निर्माण झाला. म्हणूनच ब्रह्मदेवाला ‘आत्मभू’ नावाचे भूषण प्राप्त झाले आहे. थोडक्मयात सांगायचे म्हणजे त्रिगुणांची साम्यावस्था ढळू लागली की, त्यांच्यात चैतन्य निर्माण होऊन तिन्ही गुण क्रियाशील होतात. त्यापासून पंचमहाभूतांची निर्मिती होते. ही पंचमहाभूते ईश्वराला राहण्यासाठी अंडय़ाच्या आकाराचे ब्रह्मांड निर्माण करतात.
क्रमशः