वाढत्या संसर्गामुळे चिंतेचे वातावरण : दिवसभरात 90,632 नवे बाधित : 1,065 जणांचा कोरोनाने मृत्यू
भारतात 41 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित, आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात सध्या कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. या महामारीतच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता सुधारत आहे. रविवारपर्यंत देशात 31 लाख 80 हजार 865 जण कोरोनातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशाचा रिकव्हरी रेट सुद्धा वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, रिकव्हरी रेट वाढला असला तरी बाधितांच्या एका दिवसातील आकडय़ाने प्रथमच 90 हजारांच्यावर झेप घेतल्याने चिंतेचे वातावरण कायम आहे. दरम्यान, ब्राझीलला मागे टाकत बाधितांमध्ये भारताने जगात दुसऱया स्थानी झेप घेतल्याने चिंता अधिकच गडद झाली आहे.
सध्या 8 लाख 62 हजार 320 रुग्णांवर उपचार (सक्रिय रुग्ण) सुरू आहेत. कोरोनामुळे होणाऱया रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. देशात रविवारी तब्बल 90 हजार 632 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे देशातील कोरोना संसर्गित रुग्णांचा आकडा वाढून 41 लाख 13 हजार 811 झाला आहे. तर मृतांचा आकडा 1,065 ने वाढल्याने 70 हजार 626 वर पोहोचला आहे. दिवसभरातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील 312, तामिळनाडूतील 61, आंध्रप्रदेशमध्ये 71 आणि कर्नाटकातील 128 जणांचा समावेश आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 73 हजार 642 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा 15 जूनपर्यंत रिकव्हरी रेट 51.08 होता. तो आता वाढत चालल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे आरोग्य तपासण्यांचा वेगही वाढविण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या काही दिवसात नव्या प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याने चाचण्यांची गती वाढली आहे. रविवारपर्यंत अखेरच्या चोवीस तासात तब्बल 10 लाखांहून अधिक तपासण्या करण्यात आल्याची माहिती ‘आयसीएमआर’कडून देण्यात आली. तसेच देशात आतापर्यंत 2 कोटी 41 लाख 6 हजार 535 चाचण्या पूर्ण केल्याचेही नमूद करण्यात आले.
‘वर्ल्डोमीटर’वर भारत दुसऱया स्थानी
देशात कोरोनाचा कहर थांबत नसल्याने कोरोना विषाणूने 40 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत. आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसऱया क्रमांकावर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटरवर अपडेट झालेल्या आकडेवारीनुसार भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. भारतातील एकूण बाधितांचा आकडा 41 लाख 31 हजार 690 झाला असून ब्राझीलमध्ये एकूण रुग्णसंख्या 41 लाख 23 हजार इतकी नोंद झाल्याचे रविवारी रात्री दिसून आले. सध्या जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारतापुढे आता केवळ अमेरिका हा देश आहे. भारत आणि ब्राझील यांच्या बाधितांच्या आकडय़ात सध्या जोरदार घासाघीस सुरू होती.
अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा हा 64 लाखांच्या पार पोहोचला आहे. तर 1 लाख 92 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 37 लाख लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. ब्राझीलमध्ये बाधितांचा आकडा हा 41 लाखांच्या वर आहे. तर 1 लाख 26 हजारांहून अधिक लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये 32 लाखांहून अधिक लोक आजवर बरे झाले आहेत. तर 7 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.