ऋषभ पंत मागील वर्षभराच्या कालावधीत बराच प्रगल्भ होत आला आहे आणि भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा, असे विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराला वाटते. जबाबदारीने खेळल्यास ऋषभ पंतला रोखणे कठीण ठरेल, असे लारा म्हणतो. केएल राहुल उत्तम फलंदाज आहे. त्यामुळे त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करु देणे अधिक फलदायी ठरेल, असा त्याचा होरा आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत केएल राहुलने उत्तम यष्टीरक्षण केले होते. यंदा वर्षाच्या प्रारंभी न्यूझीलंडविरुद्धही तीच मालिका त्याने कायम राखली. भारतीय संघाने केएल राहुलच्या फलंदाजी क्रमातही अनेक प्रयोग केले आणि बहुतांशी वेळा त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. मात्र, फलंदाजीत भक्कम असल्याने केएल राहुलला त्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, असे लाराला वाटते. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील 5 सामन्यात राहुलने 302 धावा फटकावल्या असून त्यात एक शतक व 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
ऋषभ पंतला त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले गेले. पण, प्रत्येक वेळी त्याने हाराकिरी करत निराशाच पदरी पाडली आहे. लाराला मात्र तो मागील वर्षभराच्या कालावधी बराचसा परिपक्व झाल्याचे भासतो. ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत 171 धावांचे योगदान दिले आहे. धोनीने ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक कोण असेल, यावरुन बरीच चर्चा झडत आली. दोनवेळा विश्वचषक जिंकून देणाऱया धोनीने भारतीय संघातर्फे 90 कसोटी, 350 वनडे व 98 टी-20 सामने खेळले आहेत.