प्रतिनिधी / बेळगाव
ब्राह्मणांमध्ये एकूण 42 उपजाती आहेत. त्या सर्वांना एकत्र करून एकाच छत्राखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. म्हणून सर्व जिल्हे, तालुक्यात भ्रमंती करून स्मार्थ, वैष्णव, गौड सारस्वत ब्राह्मण अशा सर्वांच्या भेटीगाठी घेत आहोत. एकत्रित राहिल्यानेच सरकारचे आपल्याकडे लक्ष जाईल, असे मत कर्नाटक राज्य ब्राह्मण अभिवृद्धी मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद मूर्ती यांनी व्यक्त केले.
अनगोळ येथे ब्राह्मण संघातर्फे उभारण्यात येत असलेल्या गायत्री भवनला त्यांनी नुकतीच भेट दिली व पाहणी केली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ऍड. एस. एम. कुलकर्णी उपस्थित होते.
मूर्ती म्हणाले, मूल रडले तरच आईला मुलाला भूक लागल्याचे कळते. त्याप्रमाणेच आम्ही सुद्धा आपल्या समस्यांबाबत सरकारशी संपर्क साधल्यावरच सरकार आपल्याकडे लक्ष देऊ शकेल. आपल्या मागण्या व समस्या मी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या असून सरकारी सुविधा, योजनांचा लाभ ब्राह्मण समाजालाही मिळावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष एस. एम. कुलकर्णी म्हणाले, सर्व ब्राह्मण समाजाला एकत्र आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. पोट जातींमध्ये चुकीच्या अनेक कल्पना होत्या. त्या दूर करण्यात आल्या आहेत, असे सांगितले.
संघाचे कार्यवाह रवी मुतालिक यांनी, ब्राह्मण संमेलनातून शिल्लक राहिलेल्या निधीमधून गायत्री भवन उभारण्यात येत आहे. अजून खूप काम असून मूर्ती यांनी सरकारकडून मदत मिळवून द्यावी, असे आवाहन केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करण्यात आले. शिरीष कानेटकर यांनी परिचय करून दिला. अरविंद हुनगुंद यांनी सूत्रसंचालन केले. प्रिया पुराणिक यांनी आभार मानले.