नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील कोरोना स्थितीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील राहुल गांधी यांनी दोन ओळींचे एक ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात सध्या सुरू अललेल्या केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर या वादावरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ब्लूट टिकसाठी मोदी सरकार भांडत आहे, कोविडची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा, असं दोन ओळींचे पण सूचक ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगली आहे.
केंद्र सरकारन सोशल मीडियासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचं पालन ट्विटरकडून होत नसल्याने केंद्र सरकारनं ट्विटरला शेवटची नोटीस बजावली आहे. अशातच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाशी संबंधित इतर अनेकांच्या ट्वीटर हँडलची ‘ब्लू टिक’ ट्विटरकडून काढून घेतल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. शेवटी ट्विटरनं खुलासा करत ही ब्लू टिक परत केली आणि सगळ्यांच्या ट्वीटर खात्यांवर पुन्हा ब्लू टिक दिसू लागली. या सगळ्या गोंधळानंतर विरोधकांनी विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.