गोवा कला अकादमीच्या 53व्या ‘ब’ गट मराठी नाटय़ स्पर्धेत गुरुवारी श्री पांडुरंग प्रासादिक नाटय़मंडळ, विठ्ठलापूर सांखळीच्या स्पर्धक कलाकारांनी गोमंतकीय नाटय़लेखक विवेक वाटवे यांचे ‘राजकारण’ हे ऐतिहासिक नाटक सादर केले. सांखळी येथील रवींद्र भवनाच्या स्व. मनोहरबुवा शिरगावकर नाटय़गृहात सादर झालेल्या या नाटय़प्रयोगाने ‘ब’ गट मराठी नाटय़स्पर्धेचा समारोप झाला…..
वसंत कानेटकरांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील कथानकाप्रमाणेच शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांच्या भावनिक संघर्षाची उकल करण्याचा आणि संभाजीचे गैरवर्तन, राष्ट्रद्रोह आदी गोष्टींबद्दलचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न लेखक विवेक वाटवे यांनी केला आहे. अंतर्गत धुसफुस, असूया, मत्सर, स्वार्थ, फितुरी या गोष्टींचे वलय कथानकाभोवती कायम ठेवून लेखकाने कल्पकतेच्या बळावर संभाजींची बाजू मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. अर्थातच अस्तित्वातील संभाजींचा इतिहास आणि नाटकामधून उलगडत गेलेला संभाजी यामध्येही विरोधाभास जाणवल्यास नवल नाही.
‘शिवाजी’ या भूमिकेशिवाय ऐतिहासिक नाटक अपूर्ण वाटते. लेखकाने शिवाजी आणि संभाजी या दोघांनाही कथानकामध्ये समाविष्ट केले आहे. या नाटकात शिवाजीची भूमिका संजय रेवंडीकर यांनी साकारली. संवादामधील गोडवा किंवा पल्लेदार आणि रेखीव शब्दफेकीची रसिकांची अपेक्षा पुरी करण्यात ते कमी पडले. त्यांनी वठविलेला शिवाजी महापराक्रमी राजा आहे म्हणूनच त्याबाबत चिंतन हवे. संभाजींच्या भूमिकेतील चंदन हरमलकरचे भाषण तोंडपाठ होते परंतु नको त्या शब्दांवर होणाऱया आघातामुळे काहीवेळा शब्दशुद्धता टिकली नाही. त्यांचे चालणे, आवेश, तडफ या गोष्टी सामंजस्यपूर्ण होत्या मात्र रंगमंचावरील वावर खूपच स्वैर वाटला.
गिरीश सावईकर (बाळाजी) आणि दामोदर मालवणकर (अण्णाजी) या जोडगोळीने त्यामानाने भूमिकेला साजेल असा अभिनय केला. त्यांचे भाषणही सुसूत्रित वाटले. पाठांतरही चांगले होते. जयंत पेडणेकर यांचा कवी कलशही रंगला नाही. छोटय़ाशाच भूमिकेत ते दिसले पण भूमिकेच्या बाबतीत गांभीर्य दिसले नाही. महंतेश विजापूरकर (हंबीरराव) यांची देहयष्टी भूमिकेला शोभणारी होती परंतु अडखळणे, एकसूरी बोलणे या गोष्टी टाळता आल्या असत्या. सोयराबाई झालेल्या शिल्पा साखळकरांनी आपली भूमिका समजून उमजून केली. भूमिकेला न्याय देण्याकडे त्यांचा असलेला कल जाणवत होता. राजारामच्या भूमिकेतील चिरायु विजापूरकर लोकरंजनाच्या दृष्टीने योग्य वाटला परंतु कथानकासाठी ही भूमिका अनावश्यक वाटली मात्र त्याच्या तोंडी थोडे भाषण घालून त्याला बोलते केले असते तर भूमिका अर्थपूर्ण वाटली असती.
दिलेर खानाच्या भूमिकेतील मुकुंद नाईक यांचा रंगभूमीवरील व्यवहार नेटका होता. त्याला राजेश शिरोडकरांची उचित साथ मिळाली पण दिलेर खानाचे तिन्ही प्रवेश हिंदी भाषेतूनच झाले. ज्यामध्ये संभाजीही हिंदीच बोलले आणि इखलास खान झालेले राजेश शिरोडकर हेही हिंदीतूनच बोलले. मराठी नाटय़स्पर्धेत तीन प्रवेश तेही हिंदी भाषेतून गरजेचे होते का? असा प्रश्न निर्माण झाल्यास नवल नाही.
नेपथ्य रचना चांगली होती. केशव नाईक यांनी मोजकीच प्रॉपर्टी त्यासाठी वापरली होती. उदय घाडी यांची वेषभूषा काही अपवाद सोडल्यास उत्तमच होती. श्रमेश नाईक यांची रंगभूषा उपरोल्लेखित व्यक्तिरेखांसाठी पूरक आणि पोषक होती. त्यामानाने ध्वनीसंयोजन आणि पार्श्वसंगीत उजवे वाटले. शास्त्रीय संगीतातील रागदारी गाण्याचाही वातावरण निर्मितीसाठी छान वापर झाला. त्यासाठी नितेश नाईक हे कौतुकास पात्र आहेत.
हिरव्या पार्श्वपडद्यासमोर हिरवी वस्त्रे परिधान करून वावरलेला इखलास खान फिक्कट वाटला. रंगमंचावर उभ्या असलेल्या पात्रांसमोर पाठमोरे उभे राहून भाषण करणे टाळले पाहिजे. संवादांमधील वाक्ये एका दमात बोलली पाहिजेत, हे जे रंगभूमीचे प्राथमिक नियम आहेत, ते पाळले गेले पाहिजेत.
या नाटकातील प्रकाशयोजना समाधानकारक वाटली नाही. पार्श्वपडद्यावर पसरणाऱया पात्रांच्या सावल्या, इकडे तिकडे पडणारा स्पॉट्सचा प्रकाश आदी गोष्टी नाटकाच्या सौंदर्याला बाधक ठरतात. या नाटकाचे दिग्दर्शन गोव्यातील हौशी रंगभूमीवरील अनुभवी तेवढेच हरहुन्नरी दिग्दर्शक हेमचंद्र तारी यांनी केले.
नाटक जरी अपेक्षेएवढे रंगले नाही तरी प्रयोग नेटका झाला. या नाटय़स्पर्धेत निम्म्याहून अधिक नाटके ऐतिहासिक होती. त्यामुळे ऐतिहासिक नाटकाबद्दलचे प्रेम आणि आवड यामुळे प्रेक्षकांनी या नाटकांचा मनसोक्त आनंद घेतला त्याला ‘राजकारण’ हे नाटकही अपवाद नव्हते. स्पर्धेतील सगळीच नाटके स्पर्धात्मक दृष्टिकोनातून सादरीकरणाच्या बाबतीत योग्य होती, अशीच प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली.
– दुर्गाकुमार श्रीकृष्ण नावती