भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेले अग्नितांडव आणि दहा नवजात शिशूंचा झालेला मृत्यू ही दुर्घटना नववर्षात बसलेला मोठा तडाखा म्हटली पाहिजे. या दुर्घटनेच्या वेळी आणि नंतर दुर्दैवी बालकांच्या मातांनी व नातेवाईकांनी फोडलेला टाहो आणि आक्रोशांनी या रुग्णालयाचा परिसरच हेलावून गेला. या कोवळय़ा जीवांचा बळी घेणाऱया दुर्घटनेचे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात जणांची चौकशी समिती नियुक्त झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख मदत देणार अशी घोषणा केली आहे तर विरोधी पक्ष नेते,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेचा घटनाक्रम तपासता यामध्ये मोठय़ा प्रमाणात हलगर्जीपणा झाला असे सांगत राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट करा आणि या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,असे म्हटले आहे. एकूणच नववर्षाच्या प्रारंभीच हृदय पिळवटून टाकणारा मातांचा टाहो आणि शिशुंचे मृत्यू सरकारला, प्रशासनाला धडा देणारे ठरले आहेत. सरकार यातून काय बोध घेणार हे बघायचे पण जे आज भंडारामध्ये घडले ते उद्या कुठेही घडू शकते. जी प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानुसार या रुग्णालयाचे फायर ऑडीटच झालेले नव्हते. रुग्णालयातील आग आणि इलेक्ट्रीक सामग्रीचे ऑडीट करण्यासाठी सुमारे दीड कोटी खर्चाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. पण निधीही मंजूर झाला नाही आणि ऑडीटही झाले नाही. आता चौकशी समितीच्या प्रमुख आरोग्य संचालिका डॉ. साधना तावडे काय चौकशी करतात, अहवाल कसा व केव्हा देतात आणि शासन कोणती पावले उचलते हे पहावे लागेल. पण या सर्वातून आगीत आणि धुरात घुसमटलेल्या त्या दहा चिमुकल्यांचे जीव परत येणार नाहीत. खरे तर प्रत्येक पालिका क्षेत्रात किमान एक अभियंता नियुक्त करुन गावातील वास्तुंचे फायर ऑडीट करणे गरजेचे आहे. भंडारा दुर्घटनेचा आपण योग्य तो धडा घेतला नाही आणि केवळ राजकीय झेंडे नाचवले. आरोप-प्रत्यारोपांचे सवाल-जवाब करण्यातच धन्यता मानली तर असे धडे पाठोपाठ मिळतील हे वेगळे सांगायला नको. पाश्चात्य, प्रगत देशात फायर ऑडीट हे सक्तीचे आहे. दोन खोल्यांचे घर असो अथवा पंचतारांकित महाल, ऐतिहासिक वास्तू असो अथवा सरकारी कार्यालय ठरावीक काळाने तेथे फायर ऑडीट करावेच लागते. तीच गोष्ट दवाखाने, जहाजे, विमानतळे, हॉटेल, कारखाने यांच्या बाबतीत आहे. आपल्याकडे या बाबतीत नियम असतील पण ते पाळले जात नाहीत. ओघानेच मंत्रालयाला आग लागते. महत्त्वाच्या फाईल्स जळतात. रुग्णालयाला आग लागते. बालकांचा बळी जातो. हॉटेलला आग लागते, अग्नितांडव होते. इमारतीला आग लागते, भाडेकरु रस्त्यावर येतात, काही आगी लागतात, काही लावल्या जातात. फटाके आणि रासायनिक औद्योगिक कारखान्यात तर हे नेहमीच घडत असते. कापसाच्या गोदामांना आगी लागतात. प्रतिवर्षी दुर्घटनात अनेक निष्पापांचे बळी जातात. वित्तहानी, प्राणहानी हेते. होत्याचे नव्हते होत असते. आपण हळहळतो, काहींना मदत मिळते, काहींना विमा मिळतो पण आपण या दुर्घटनेतून काही शिकत नाही. भंडारा येथील दुर्घटना रात्री दोनच्या अंधारात झाली. एका नर्सला बॉर्न युनिटमधून धूर येताना दिसला ती जागी व सजग होती. तिने तातडीने सर्वांना पाचारण केले. मदत व बचाव कार्य सुरु केले. अग्निशमन दल व काही कर्मचारी यांनी प्रसंगावधान व धाडस करत काही बालकांचे प्राण वाचवले पण दहा नवजात कोवळय़ा शिशुंचा बळी गेला. रुग्णालय परिसरात मध्यरात्रीच्या अंधारात या शिशुंच्या मातांच्या टाहोंनी काळीज गलबलून जात होते. पोटचा गोळा असा आगीत होरपळून नष्ट होताना काय यातना झाल्या असतील याची कल्पनाही करता येत नाही. या दहा मातांची जी हानी झाली ती कोणत्याही भरपाईने, चौकशीने वा मदतीने भरुन येणारी नाही. अर्थात या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे आणि शासनाने व आपण नागरिकांनीही यातून धडाही घेतला पाहिजे. एखादा पूल पडला की जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट, रुग्णालयाला आग लागली की रुग्णालयाचे फायर ऑडीट ही कार्यशैली थांबवून अशी दुर्घटना घडू नये म्हणून पावले उचलली पाहिजेत. सरकारी कामांचा दर्जा, गुणवत्ता या संदर्भानेही पावले उचलली पाहिजेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भंडारा दौरा करुन शोकाकूल परिवारांचे सांत्वन केले. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तेथे तातडीने पोहचले हेते. भंडारा जिह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदमही दुर्घटनेची वार्ता समजताच आपला नियोजित दौरा अर्ध्यावर टाकून भंडारा जिह्यात रवाना झाले. मदत होईल, चौकशी होईल, विधिमंडळात आणि बाहेरही आरोप-प्रत्यारोप होतील. एखादा अधिकारी किंवा ठेकेदार यांच्यावर कारवाई होईल पण मूळ प्रश्न आणि त्यामध्ये खोलवर जाऊन सुधारणा,प्रतिबंधक उपाय योजना करायच्या तर धोरणात्मक निर्णय व त्यासाठीच्या पायाभूत सुधारणा गरजेच्या आहेत. केवळ अग्निशामक बंबाची खरेदी पुरेशी नाही, इमारतींचे व आस्थापनांचे फायर ऑडीट झाले पाहिजे. आज अनेक अभियंते आणि फायर सोल्युशन तज्ञ विदेशात जाऊन नोकऱया करतात. त्यांची पालिका क्षेत्रात फायर ऑडीटसाठी नियुक्ती करण्याची गरज आहे. पालिका क्षेत्रातील कार्यालये, दवाखाने, हॉटेल, कॉलेज, इमारती आणि उद्योग-व्यवसाय यांचे फायर ऑडीट या अभियंत्यां मार्फत झाले तर खऱया अर्थाने काही शिकलो असे होईल अन्यथा आज भंडारा रुग्णालयाचा धडा मिळाला. काल मंत्रालयातील धडा मिळाला होता. उद्या आणखी कोणता मिळेल. भंडारा दुर्घटनेचा धडा समजून घेतला पाहिजे व योग्य पावले निर्धाराने टाकली पाहिजेत.
Previous Articleलस फुकट मिळेल, लस विकत मिळेल
Next Article एक डोसच्या लसीद्वारेही अँटीबॉडीची निर्मिती
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.