अरविंद केजरीवाल यांच्या भेटीने समाज नेते भारावले
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील 60 टक्के लोकसंख्या असलेल्या भंडारी समाज संस्थेने दिलेल्या निमंत्रणावरून रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाटो पणजी येथील समाजाच्या मुख्य कार्यालयास भेट दिली. सुमारे 106 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या समाज संस्थेच्या मुख्य कार्यालयास भेट देणारे केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष देवानंद नाईक, सरचिटणीस फक्रू पणजीकर, सचिव कृष्णकांत गोवेकर, जोगुसो नाईक, कार्यकारिणी सदस्य एकनाथ तारी, मंगलदास नाईक आदींच्या उपस्थितीत स्वागत केले.
त्यावेळी बोलताना श्री. केजरीवाल यांनी भंडारी समाजाने दिलेला आदर आणि प्रेमाबद्दल आपण मनापासून आभार मानत असल्याचे सांगितले. आज आपण येथे दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर भंडारी समाजाचा धाकटा भाऊ म्हणून आलो आहे, असेही ते म्हणाले. समाजा समोरील अनेक आव्हाने, समस्या मला माहित आहेत. त्या मुद्यांवर विचार करून त्या दिशेने काम करूं, अशी ग्वाही केजरीवाल यांनी यावेळी दिली.
गोवा ही भगवान परशुरामाची भूमी आहे. याच भूमीवर 1962 मध्ये पणजी शहरात गोमंतक भंडारी समाजाची स्थापना झाली. अशा या समाजसंस्थेच्या कार्यालयास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट दिली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले. केजरीवाल यांची दिल्लीतील कामगिरी प्रशंसनीय आहे. ते शब्दाचे माणूस असल्याने गोवेकरांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करतील. त्यामुळे गोव्यात सत्ता मिळाल्यास दिल्लीप्रमाणेच गोव्याचा विकास गतीमान होईल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. समाजाचे उपाध्यक्ष देवानंद नाईक यांनीही विचार मांडले.