वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी बहुचर्चित भंवरी देवी हत्याप्रकरणी मुख्य आरोपी माजी मंत्री महिपाल मदेरणा समवेत 7 आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायाधीश दिनेश मेहता यांच्या खंडपीठाने आरोपींची जामिनावर सुटका केली आहे. सुमारे 10 वर्षांनी हे आरोपी तुरुंगातून बाहेर पडणार आहेत. याप्रकरणी आता केवळ एक आरोपी तुरुंगात राहणार आहे.
जोधपूर जिल्हय़ातील एका व्यक्तीने 1 सप्टेंबर 2011 रोजी स्वतःची पत्नी भंवरी देवी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती. तसेच स्वतःच्या पत्नीच्या अपहरणाचा संशय त्याने व्यक्त केला होता. या प्रकरणी राज्याचे तत्कालीन मंत्री महिपाल मदेरणा समवेत तीन जणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते.
राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपविली होती. चौकशीत काँग्रेस आमदार मलखात सिंह विश्नोई यांचेही नाव समोर आले होते आणि त्यांना अटकही करण्यात आली होती. याप्रकरणी एकूण 15 जणांना अटक झाली होती. तेव्हापासून मलखान सिंह आणि महिपाल मदेरणा समवेत सर्व आरोपी तुरुंगातच होते. केवळ एका आरोपीला जामीन मिळाला होता. भंवरी देवीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचा सीबीआयचा दावा आहे. मृतदेह जाळून त्याचे अवशेष कालव्यात टाकल्याचेही बोलले गेले.