प्रसाद चौगुले यांची प्रतिक्रिया, कराडचे नाव गाजवले, आता महाराष्ट्राचे गाजवणार
सुभाष देशमुखे/ कराड
आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी नियोजनबद्ध वाटचाल करणं म्हणजेच शिस्तबद्धता! संस्काराने, विचाराने, आचाराने ही शिस्त रुजवता येते. चांगल्या पगाराची पुण्यातील नोकरी करून ‘कार्पोरेट लाईफ’ जगलो असतो; पण मला समाजाशी नाळ जोडायची होती. त्यासाठीच प्रशासकीय सेवेत करिअर हवं होतं. तेच मिळवण्यासाठी पुण्यातील नोकरी सोडली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा दीड वर्षे अभ्यास केला. तासन्तास पुस्तक घेऊन बसण्यापेक्षा ‘क्वालिटी ऑफ स्टडी’ला प्राधान्य दिले. शुक्रवारी निकाल पाहिला. निकालावर माझे आणि वडिलांचे नाव पाहिले आणि डोळ्यात पाणी उभा राहिले. भक्कम पगाराची नोकरी सोडल्यावर एका शब्दानेही न बोलता माझ्या निर्णयाला ज्यांनी पाठबळ दिले, त्या आई-वडिलांपुढे नतमस्तक झालो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला आलेला प्रसाद बसवेश्वर चौगुले ‘तरुण भारत’शी बोलताना भावूकही झाला अन् आनंदीही!
कराडचे नाव महाराष्ट्रात गाजवले, आता भारतीय प्रशासकीय सेवेत प्रयत्न करून महाराष्ट्राचे नाव देशात गाजवण्याचा निश्चयही प्रसाद चौगुले यांनी बोलून दाखवला.
कराड तालुक्याची ओळख आतापर्यंत राजकीय ख्याती असलेला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक वारसा अससेला तालुका म्हणून होती. प्रसाद बसवेश्वर चौगुले याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदावर पहिला नंबर मिळवून कराडच्या शैक्षणिक गुणवत्तेला देशात नवी ओळख मिळवून दिली. कराडच्या बनवडीचा प्रसाद मेकॅनिकल इंजिनिअर होऊन पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी करत होता. वडील विद्युत विभागात नोकरी, तर आई उमा चौगुले गृहिणी. प्रसादचे भावोजी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. नोकरी करत असलेल्या प्रसाद यांचे नोकरीत मन फारसे रमत नव्हते. समाजाशी नाळ जोडणारे काम करायची इच्छा खुणावत होती. चांगल्या पगाराची नोकरी सोडली तर लोक काय म्हणतील, घरचे काय बोलतील, मित्रांच्यात काय प्रतिक्रिया येतील या प्रश्नांनी मनात घर केले होते. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवायचेच, हा निश्चयही झोप लागू देत नव्हता. या निश्चयाचा पाठलाग करण्यासाठी अखेर प्रसाद यांनी नोकरी सोडली. पोराने नोकरी सोडली म्हणून आई-वडिलांनी चिंता व्यक्त न करता त्याला स्पर्धा परीक्षेसाठी भक्कम पाठबळ दिले. बहीण, भाऊजींनी, मित्र राजेश गिड्डे यांनी साथ दिली. या पाठबळ आणि साथीने प्रसाद यांचे मनोधैर्य उंचावले. त्यामुळे त्यांनी दीड वर्षांच्या अभ्यासाचे नियोजन केले. प्रश्नावलीवर लक्ष ठेवणे, नोटस् काढणे, शासकीय वेबसाईट वारंवार पाहणे यासह ठराविक वेळेत केवळ वाचन न करता अभ्यास मनात रुजवणे. दीड वर्षे असा क्वॉलिटी ऑफ स्टडी केल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षेचे आव्हान स्वीकारले. शालेय शिक्षण उंब्रजला तर महाविद्यालयीन शिक्षण कराडला झालेला प्रसाद 2017 साली इंजिनिअर झाला होता. हल्ली पैशालाच भांडवल समजणाऱया समाजात शिक्षण हेच भांडवल आहे, हा विचार त्यांच्यात आई-वडिलांनी रुजवला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे आव्हान पेलणे प्रसाद यांना शक्य झाले.
गत तीन महिन्यात कराड तालुक्यात कोरोनाच्या आकडय़ांनी काहीसे नकारात्मक वातावरण तयार केले होते. त्यामुळे कराडची सोशल मीडियावर चेष्टाही केली गेली. पण याच कराडच्या प्रसाद चौगुले याने महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवून कराडच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा चुणूक संपूर्ण राज्याला दाखवली. प्रसाद चौगुले ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, शिक्षण हेच भांडवल आहे हे आई-वडिलांनी लहानपणापासून शिकवले होते. उपजिल्हाधिकारी परीक्षा पास झाल्यावर मला आता भारतीय प्रशासकीय सेवेचे वेध लागले आहेत. जसा महाराष्ट्रात कराडचा लौकीक झाला, तसाच देशात झेंडा रोवायचा आहे. त्यासाठी नव्याने शिस्तबद्ध अभ्यासाला सुरुवात करायची आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या युवा पिढीने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध अभ्यासाचा आराखडा तयार करावा. तयार केलेला आराखडा निश्चयाने प्रत्यक्षात उतरवल्यास यश नक्कीच मिळेल. यश मिळाले नाही तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने तयारी करावी. स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो, असा सल्लाही प्रसाद चौगुले यांनी नव्या पिढीला दिला.
आई-वडील निःशब्द झाले…
प्रसाद यांना यशाची खात्री होती. मात्र जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत फोटोसुद्धा काढायचा नाही, असे आईने बजावले होते. आई उमा चौगुले या अत्यंत साध्या आहेत. शुक्रवारी जेव्हा निकाल लागला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी उभा राहिले. वडील बसवेश्वर चौगुले यांना हा आनंदाचा धक्काच होता. प्रसाद यांच्या यशाबद्दल बोलताना ते दोघेही निःशब्द झाले. त्यांच्याकडे आनंद व्यक्त करायला शब्द नव्हते. मात्र चेहऱयावरील भाव सर्व काही सांगून जात होता.