तहानभूक काही न जाणता लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते, त्याप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजतात त्यांच्यासाठी काहीही करण्यास मी लाजत नाही. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर ती त्यांची आवड मी पूर्ण करतो. याप्रमाणे ते जो जो हेतु मनात धरतात तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन पूर्ण करतो. त्यांची वर्तणूक मला त्यांच्या मोहात टाकते. ते डोळय़ांनी मलाच पाहतात, कानांनी माझ्याच गोष्टी ऐकतात, मनामध्ये माझीच कल्पना करतात व वाणीने माझे वर्णन करतात. दान पुण्य इत्यादि जे काही करतात ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. जे आतबाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले असतात. त्यासाठी ते स्वतःचा मोठेपणा दूरच टाकून देतात, शास्त्राध्यायन केलेच नाही अशी वृत्ती ठेवतात. अशा प्रकारे स्वतःकडे लहानपणा घेतात म्हणून त्यांना माझे सानिध्य प्राप्त होते. माझ्या भक्ताला लोक अजागळ, भोळसट समजतात पण लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही त्या माझ्या परमात्म्याचे ठिकाणी सामान्य व अजागळ लोकांना प्रवेश कसा मिळेल ? याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे, तसेच संपत्तीचा अभिमान ओवाळून टाकून द्यावा. पान, फळ, फूल अथवा पाणी जो मला भक्तीने अर्पण करतो त्या शुद्धचित्त मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते पानफूलादि मी सेवन करतो. त्यात त्याने गरुडासारखी वाहने, कल्पवृक्षांचे बगीचे व कामधेनूंचे कळप मला अर्पण केले असे मी समजतो. मी भक्तांच्या थेंबभर पाण्याने असा संतुष्ट होतो आणि उद्धवा हे सांगावयास कशास पाहिजे ? पोह्यांकरता सुदामदेवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने कशा सोडल्या हे सर्वांनी पाहिले आहे. मी एक भक्तीच ओळखतो. मग त्या ठिकाणी लहानथोर अशी निवड करत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीला पाहुणे म्हणून हजर असतो. तो जे जे करतो, जे भोगतो, जे हवन करतो, जे दान देतो, तप करतो ते सर्व मला अर्पण करतो. जे जे कर्म, जसे जसे त्याच्याकडून स्वभावतः पूर्ण, अपूर्ण जसे घडेल ते ते सर्व तो मला अर्पण करतो. यामुळे कर्मांची शुभाशुभफलरूप जी बंधने त्यापासून तो मुक्त होतो. या संन्यासरूपी म्हणजेच कर्मफलत्यागरूपी कर्मयोगाने कर्मबंधनापासून मुक्त होऊन तो माझ्या समीप येतो. त्याने ज्यावेळी कर्म मला अर्पण केले, त्यावेळीच त्याचे जन्ममरण पार नाहीसे होते आणि जन्म नाहीसा झाला की, जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे होतात. वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली की, देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि माझ्या सुखरुप स्वरूपाशी त्याचे अनायासे ऐक्मय होते. आणखी एक महत्वाचे म्हणजे भक्त अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्यभक्त होऊन माझी भक्ती करेल तर तो साधूच मानला पाहिजे. कारण त्याचा मार्ग योग्य असतो. मरणप्रसंगी ज्या वासनेला घेऊन बुद्धी असते त्या वासनानुरूप खरोखर पुढील जन्म मिळतो. याकरता ज्याने आपला जीव अखेरीस भक्तीला अर्पण केला तो पूर्वी पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे, असे समज. म्हणून पूर्वी केलेल्या दुराचरणाविषयी पश्चात्तापरूपी तीर्थात स्नान करून तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला तर त्याचा निश्चित उद्धार होतो.
क्रमशः