अध्याय तेरावा
ज्ञात्याला देहाचा कधी गर्व होत नाही. तसेच देहभोगांचे सुखदुःख असत नाही. पूर्वीच्या संचित कर्मामुळे देह उत्पन्न होतो. तो सर्व इंद्रियांसह व प्राणांसह दैव ठरवेल त्याप्रमाणेच वागत असतो. सर्व अहंभाव सोडून तो चिदानंदामध्येच समाधिस्थ झालेले असतो. सदोदित निराभिमानाने राहणे याचेच नांव अखंड समाधी होय. त्याच्या सर्व संकल्पविकल्पांचा शेवट झालेला असतो. मनाच्या या अवस्थेचे नाव निर्विकल्प समाधी होय. त्याचा देह उरलेल्या प्रारब्धाच्या गतीने क्रिया करतो. तो प्रारब्धाप्रमाणे जी जी स्थिती प्राप्त होईल त्या त्या क्रमाने वागत असतो. त्याच्या या स्थितीला स्वभावसिद्ध समाधी असे म्हणतात. भोग भोगूनही तो अलिप्तच असतो. तो या सर्व संबंधांपासून अगदी वेगळा होऊन त्यांच्यामध्ये वागत असतो. कर्मापासूनच उत्पत्ती होते, कर्मापासूनच परब्रह्मप्राप्ती होते, पण महान् योगी असतात ते त्या कर्मामध्येच निष्कर्म स्थितीने वागत असतात. थोडक्मयात ते देही उदासीन राहून अंतर्यामी सदैव सावध असतात. संसारात साक्षी असून सदैव आत्मरूपी एकनि÷ असतात. तो संसारात रमेल किंवा वेडय़ासारखा अरण्यामध्ये राहील किंवा एकांतामध्ये स्वस्थ राहिल, पण त्याच्या मानसिक स्थितीमध्ये काहीही बदल होत नाही. सिंहासनावर बसून जो राजेपणा प्राप्त झालेला असतो, तो बागेत खेळ खेळत असताना काही नाहीसा होत नाही. किंवा तो शिकारीमागे पळत असला म्हणूनही त्याचा थोर राज्याधिकार ढळू शकत नाही. राजाने रानात जाऊन वस्ती केली, तरी त्या रानामध्ये त्याचे राजभोग येऊन पोहोचतातच. त्याप्रमाणे योगी स्वस्वरूपाला पोचूनही प्रारब्धाच्या अवस्थेप्रमाणे अनेक प्रकारची कर्मे करताना दिसत असले, तरी त्यांची आत्मस्वरूपस्थिती मुळीच बिघडत नाही.
म्हणून समाधी लावणे आणि समाधी विसर्जन करणे या दोन्ही अवस्थांचा अनुभव अर्धवट ज्ञानी असतात त्यांनाच घडतो. परिपूर्ण ज्ञानी मनुष्य कायम समाधीतच असतो. कारण, परिपूर्ण असतात त्यांना आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काहीएक उरलेले नसते. एव्हढे सांगून झाल्यावर भगवंत सनकादिकांना म्हणाले, अत्यंत गुह्य, श्रे÷ातील श्रे÷, असे जे उपनिषदातील भांडार, ते मी तुम्हाला सांगितले. या ज्ञानाकरिता मुमुक्षु लोक खडतर कष्ट सोसून कोटय़वधी साधने करतात, योगी लोक गिरिकंदरांत शिरून आसनमुद्रा वगैरे करतात. ज्याच्यासाठी वेदशास्त्रांच्या सर्व युक्त्या असमर्थ ठरतात ते आत्मज्ञान मी सांगितले. पुढे भगवंत सनकादिकांना म्हणाले, मी येथे येण्याचे कारण हेच की, तुम्ही ब्रह्मदेवाला प्रश्न केला होता, त्याचे उत्तर देण्याच्या निमित्ताने ब्रह्मज्ञानाचा उपदेश तुम्हाला करावा. या उपदेशाचे पालन केल्यास वर्णाश्रमधर्म न सोडता माझे दर्शन होते. माझ्या उपदेशाचे सार हेच की, देह हाच मुळी मिथ्या होय हे आहे. सांख्य या नावाचे जे श्रे÷ ज्ञान, अष्टांगादि साधनाने साध्य होणारा योग किंवा सत्याचे जे सत्यत्व, तेच माझे खरे स्वरूप आहे. संत हे सद्धर्माने वागत असतात त्यांची वाणी निरिच्छ असल्याने ते बोलतात ते माझेच बोल असतात.
तेजाचा जो प्रगल्भपणा किंवा लक्ष्मीला प्राप्त झालेले ऐश्वर्य हे माझ्यामुळेच होय. साधु लोकांना मिळणारी कीर्ती माझ्या कीर्तनामुळेच लाभते. माझ्याच प्रभावाने सर्वांना निग्रहता लाभते. जे कधी दमाचा स्वीकार करणारे नव्हेत, त्यांनाही दम माझ्याच सामर्थ्याने दमन करावयास लावतो.
यावरून ध्येय आणि ध्यान किंवा साध्य आणि साधन ह्या सर्वांना आश्रयाचे स्थान मीच असतो हे लक्षात येईल. माझ्याकडूनच त्यांना कार्याची प्रेरणा मिळते. खरे पाहिले तर मी निरिच्छ व निर्गुण आहे तरी त्या माझ्यातल्या गुणांची कल्पनेने भक्ती करून सुहृद, आत्मा, प्रिय इत्यादि लक्षणे मला लावतात. समता आणि निःसंगता या गुणांच्या अवस्थाही माझ्या माथी आणून ठेवतात. मी तर गुणांना शिवतसुद्धा नाही, तरी मला लीलाधारी असे म्हणतात. वास्तविक पाहता मी घेणाराही नव्हे आणि देणाराही नव्हे. मला करताकरविता म्हणतात पण माणसाच्या हातून जी काही कर्मे घडतात ती प्रारब्धानुसार त्रिगुणांच्या प्रभावाने घडत असतात.
क्रमशः