(अध्याय दुसरा)
भगवतभक्ती कोणत्या क्रमाने करावी याबाबत भागवताच्या एकादश स्कंधाच्या आधारे मार्गदर्शन करताना नाथमहाराज सांगतात की, माणसाला हा देह म्हणजेच मी असे वाटत असते. या देहबुद्धीमुळेच माणूस अहंकारी होतो आणि सुखोपभोगांची हाव बाळगतो व जन्म मरणाच्या फेऱयात अडकतो. यातून सुटण्यासाठी इंद्रिये ताब्यात ठेवून विषयातून सुटू पाहतो पण विषय तर त्याला पुनः पुन्हा कवटाळू पाहतात. माणसाची ही अवस्था बघितल्यावर वेदांनी हरिभक्ती प्रकट करून ठेवली आहे. काया, वाचा आणि मनाने आपले म्हणून जे काही आहे ते भगवंताला अर्पण करणे म्हणजेच भागवतधर्म होय. पुढे म्हणाले, आपल्या अकरा इंद्रियांचा उपयोग करून भगवतभक्ती कशी करावी हे आता सांगतो,
मनाने हरीचे ध्यान करावे, कानाने त्याची कीर्ती सतत ऐकावी, जिभेने नामस्मरण करावे, हाताने हरीची पूजा करावी, पायाने मंदिराची वाट चालावी,
हरिचरणी वाहिलेल्या तुळशींचा नाकाने वास घ्यावा,
निर्माल्य मस्तकावर धारण करावे म्हणजे त्याबद्दल पूज्य भाव असावा, तीर्थ व हरिप्रसाद पोटात घ्यावा,
याप्रमाणे इंद्रियांचे वर्तन चालू ठेवावे म्हणजे सद्भाव वाढू लागतो, प्रेम प्रकट होऊ लागते व अखंड भजन घडू लागते परिणामी संसार बंधनातून सुटका होते.
स्वतः भगवंतानी सांगितले आहे की, मी भक्तीच्या आधीन आहे आणि केवळ भक्तीनेच प्राप्त होणारा आहे.दिवसेंदिवस भक्ताच्या मनामध्ये भगवंताबद्दलचे प्रेम वाढतच जाते आणि आत्मबोधाच्या योगाने मनामध्ये पुरुषोत्तम प्रगट होतो.आता एकदा मन देवरूप झाले की त्याचा प्रभाव इंद्रियावरही पडतो आणि त्यांच्या हालचालीसुद्धा त्यानुरुप होऊ लागतात. डोळय़ांना समोरील वस्तू आहे त्या स्वरूपात न दिसता देवरूपच दिसते. हे दृष्टीचे अर्पण होय!
जो बोलवणारा असतो तोच ऐकण्यासाठी कानात बसलेला असतो. म्हणजेच बोलणारा आणि ऐकणारा एकच म्हणजे परमेश्वर! समजा तुम्ही जप करत आहात तर जप करून घेणारा देवच आणि ऐकणारही देवच. डोळे आधीच अर्पण झालेले आहेत ते मूर्त नजरेसमोर उभी करतात. म्हणून कान आणि वाणी एकदमच अर्पण होते.सततच्या भक्तीने भगवंतांचा वावर जाणवायला लागतो आणि वातावरण सुगंधित होते. कारण फुलाला सुवास देणारा स्वतः हजर होतो. त्याची चाहूल नाकाला लागते मग घ्राणेंद्रिय समर्पण व्हायला कितीसा उशीर! जीभ रसाचा आस्वाद घेऊ लागली की देव स्वतः रसास्वाद होतो आणि रसनेत येऊन राहतो. रस रसना आणि रसास्वाद असा एक अभिन्न आत्माच होतो, या भावनेने रस सेवन केला की परमानंद प्रकट होतो आणि रसनेंद्रिय ब्रह्मार्पण होते. हाताने ज्याला ज्याला स्पर्श करायला जातो ते ते भगवंत स्वरूप आहे असे जाणवते. जो जो पदार्थ घ्यायला जावा तो तो भगवंत स्वरूप वाटतो. पायांनी चालायला जावे तो मार्गच देवरूप होतो आणि चालण्याचे कर्म आपोआपच ब्रह्मार्पण होते. क्रमशः