त्याची प्रत्येक कृती आता भगवतस्वरूप झाली असून त्याची सर्व कर्मे ही आता भगवंतांची जबाबदारी झाली आहे. साहजिकच त्याला करायचे असे काही उरलेलेच नाही. मग अमुक एक काम करायचे राहिले किंवा अमुक एक मी केले आहे, त्याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही ना अशी भीती किंवा चिंता त्याच्या मनात नसतेच.’ पण अशी स्थिती प्राप्त झालेला भक्त विरळाच! विरळा म्हणजे किती? तर लाखात किंवा करोडोत एखादा! बाकीचे चिंता, काळजी, भय यांनी ग्रासलेले असतात. आता यावर उपाय काय, तर भगवत भजन हाच एकमेव उपाय यावर आहे. आता भीती नष्ट करण्यासाठी भगवत भजनाचा काय उपयोग असे काही महाभाग विचारतील, तर त्यावर उत्तर असे की, ज्यांची भीती नष्ट झालेली आहे त्यांची जबाबदारी भगवंतांनी घेतलेली आहे, असे आपण बघितले. कारण भगवंत घडवून आणतील ते आपल्या भल्याचेच असेल अशी त्यांना खात्री आहे. मग अशी खात्री ज्यांना वाटत नाही त्यांना अज्ञानामुळे मायेच्या आवरणाने ग्रासलेले आहे. त्यामुळे त्यापलीकडे उभा असलेला भगवंत त्यांना दिसतच नाही. हा मायेचा पडदा भगवतभक्तीनेच दूर होतो असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे ते म्हणतात, ‘माया ही माझी शक्ती आहे आणि तिच्या तावडीतून सुटायला भगवतभजनच आवश्यक आहे. आपण आणि भगवंत वेगळे आहोत असे समजणे हेच भयाचे कारण आहे. त्यामुळे कितीही विद्वान असला तरी जोपर्यंत तो माझी भक्ती करत नाही, तोपर्यंत तो भयमुक्त होत नाही. जन्म मरणाच्या भयाने नाना प्रकारच्या दुःखाच्या राशी लोक सोशीत असतात. फक्त हरिभक्तांचा त्याला अपवाद असतो. भक्तीचा महिमा खरोखर अगाध आहे. त्यासाठी सद्गुरुचरणांची सेवा मनोभावे करावी.’ माया ही भगवंताची शक्ती आहे आणि तिच्या पाशातून सुटण्यासाठी भगवत भजन हेच आवश्यक आहे. एकदा भजनाची गोडी लागली की भगवंतांच्यात आणि आपणात असलेला द्वैत भाव मिटून जातो. जिवा शिवाचे ऐक्मय झाले की, ब्रह्मज्ञान व्हायला कितीसा उशीर? तेव्हा भगवत भजन हीच ब्रह्मज्ञान होण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून ते साधण्यासाठी सद्गुरुचरणांची मनोभावे सेवा करावी. शिष्याला अंतिम सत्याची अनुभूती करून देणारे व सर्वत्र चैतन्य आहे याची जाणीव करून देणारे गुरु असतात, त्यांना श्रीकृष्ण सद्गुरु म्हणतात.
सद्गुरु सर्वथा परमात्मा व तत्वतः परब्रह्म असतात. सद्गुरुची भेट व्हायला सद्भाग्य असावे लागते. निष्काम पुण्याचा अति मोठा संचय, तीव्र वैराग्याची जोड आणि योग्य काय, अयोग्य काय याचा विचार करून वागण्याची आवड इतक्मया गोष्टी एकत्र येतात तेव्हा सद्गुरुंची कृपा प्राप्त होते. अशी कृपा झाल्यावर भक्तीचे अनमोल भांडार अनायासे उघडते आणि कळीकाळही पळू लागतो. मग संसार भयाची तेथे काय कथा? यावरून सद्गुरुंचा महिमा ध्यानी येतो. आईवडील एकाच जन्मी तुमची काळजी घेतात तर सद्गुरु जन्मोजन्मी तुमची काळजी घेतात.
तुमचा गर्भवास चुकवतात, म्हणून गुरु हा सर्वतोपरी पूज्य असतो. देवही सद्गुरुच्या तुलनेस पुरत नाहीत. गुरु आणि ब्रह्म यांची तुलना केली असता गुरु कांकणभर सरसच ठरतील. सद्गुरुंच्या चरणावर ज्याची निस्सीम भक्ती असते त्यांचे मनोरथ देवही पुरवतो. कारण सद्गुरुंची आज्ञा देवालाही पाळावी लागते. गुरुंना ब्रह्म समजून अनन्यभावाने जे बुद्धिमान भक्त सद्गुरुचरणांची सेवा करतात ते जनार्दनाचे आवडते होतात.
क्रमशः