ऑनलाईन टीम / पुणे :
श्रीमद् भगवद्गीता हे अत्यंत मोलाचे असे अध्यात्मशास्त्र आहे. अर्जुनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान सामान्यांना सांगितले, ते या ग्रंथामध्ये आहे. सर्वसामान्य माणसाला जीवनात कसे जगावे यापासून ते स्वत:ला कसे ओळखावे, यापर्यंत सर्व स्तरांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर जाऊन श्रीकृष्णांनी उपदेश केलेला आहे. त्यामुळेच सर्व उपनिषदांचा अर्क भगवद्गीतेत सामावलेला आहे, असे प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.विश्वासबुवा कुलकर्णी यांनी सांगितले.
कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजित श्री दत्तजयंती उत्सव 2020 चा प्रारंभ मंदिरामध्ये झाला. मोक्षदा एकादशी व गीताजयंतीनिमित्त विश्वास कुलकर्णी यांचे कीर्तन झाले.
ह.भ.प.विश्वासबुवा कुलकर्णी म्हणाले, वास्तविकपणे प्रकृतीच्या गुणांच्या द्वारे कर्म केली जातात. मात्र, अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीव आहे. तो या कर्मांचा स्वत:ला कर्ता समजतो. हा अहंकार त्याला झालेला असतो, प्रत्यक्षात तसे नसते. ती कर्म प्रकृतीच्या गुणांद्वारे झालेली असतात. त्यामुळे स्वत:कडे कर्तव्य घेऊन अहंकार बाळगू नये, असे भगवद्गीता सांगते. सर्व संत अहंकारापासून दूर रहायला सांगतात. ज्याला अहंकार असले त्याला ज्ञानरुपी अन्न जिरणार नाही. जोपर्यंत मनात अहंकार आहे, तोपर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचता येत नाही. अहंकार पूर्णपणे विरल्याशिवाय आत्मज्ञान मिळणार नाही, ही शिकवण दत्तगुरुंसह सर्वच सद्गुरूंनी दिली आहे.